इरफान सय्यद, प्रतिनिधी
Pratap Sarnaik Latest News : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मराठी न बोलणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर 17 ऑगस्टनंतर कठोर कारवाई केली जाईल,असा स्पष्ट इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.राज्यातील हिंदीभाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेची अंतिम मुदत 15 ऑगस्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून राज्यभर जवळपास 450 शिक्षक विविध शहरांमध्ये,जिल्ह्यांमध्ये आणि ग्रामीण भागात चालकांना मराठीचे धडे देत आहेत.
"...तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल"
सरनाईक यांनी म्हटलंय की,17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे या उपक्रमाची सांगता होणार आहे. त्यानंतर नियमांची कडक अंमलबजावणी केली जाईल. एखाद्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला प्रवाशांसोबत आवश्यक तेवढं मराठीत संवाद साधता आला नाही, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.महाराष्ट्रात व्यवसाय करताना मराठीचे ज्ञान आवश्यक असून नियमांचे पालन न करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
नक्की वाचा >> Ulhasnagar News : उल्हासनगरचा 'तो' परिसर, एक घरातून विद्यार्थ्यांना विकला जातोय गांजा, पालकांमध्ये घबराट
सरनाईकांचं रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठं आवाहन
आतापर्यंत लाखो हिंदीभाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठीचे धडे घेतले असून अनेक चालक आता प्रवाशांशी मराठीत संवाद साधत असल्याचा दावाही सरनाईक यांनी केला.दरम्यान,15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकून घ्या,अन्यथा 17 ऑगस्टनंतर कारवाईला सामोरे जावे लागेल,असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांना केले आहे.