विशाल पुजारी, प्रतिनिधी
कार चालवताना निवृत्त प्रभारी कुलगुरुंना अटॅक आल्यानं काळाजाचा ठोका चुकवणारा अपघात घडलाय. कोल्हापूरमधल्या सायबर चौकात हा भयंकर अपघात झाला. प्रा. वसंत चव्हाण असं या कारचालकाचं नाव आहे. ते कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त प्रभारी कुलगुरु होते. चव्हाण कार चालवत असतानाच त्यांना अटॅक आला आणि त्यांचे नियंत्रण सुटलं. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापूरच्या सायबर चौकात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या चौकातून नेहमीप्रमाणे वाहतूक सुरु होती. त्याचवेळी सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास चव्हाण यांच्या कारनं ऐन चौकातच एकमेकांना क्रॉस होणाऱ्या काही वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, दुचाकीवरील लोकं जागेवरच उडाले. कारची धडक पहिल्यांदा ज्या दुचाकीला लागले ती दुचाकी दुसऱ्या दुचाकीला जाऊन धडकली.
( जबरदस्त षट्कार ठोकला अन् जमिनीवर कोसळला, परत उठलाच नाही; अंगावर काटा आणणारा Video )
या अपघातामध्ये कारचालक वसंत चव्हाण, हर्षद पाटील आणि आणखी एकाचा मृत्यू झाला. हर्षद पाटील हा 16 वर्षांचा अल्पवयीन मुलगा होता. तो नुकताच दहावीची परीक्षा पास झाला होता. हर्षद प्रथमेश पाटील आणि जयराम पाटील या मित्रांसह दौलतनगरवा नाश्टा करण्यासाठी निघाला होता. त्याचवेळी कारच्या धडकेत त्याचा मृत्यू झालाय. या अपघातील तिसऱ्या मृत व्यक्तीचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही.
चव्हाण यांना भोवळ आल्यानं त्यांचं कारवरील नियंत्रण सुटलं अशी माहिती पोलिसांनी दिलीय. त्यांना आणखी काही आजार होता का? याचा तपास सध्या सुरु आहे. या अपघातानंतर बघ्यांची गर्दी चौकात जमा झाल्यानं वाहतुकीची काही काळ कोंडी झाली होती. सर्व जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.