Latur News : लातूरमधून एक अत्यंत प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. एक १० वर्षांचा मुलगा अरविंद राठोड याची सध्या देशभरात चर्चा होत आहे. जी मुलं कायम मोबाइलवर आपला अधिकांश वेळ घालवतात, शारिरीक मेहनतीची कामं टाळतात अशांसाठी अरविंद प्रेरणादायी ठरला आहे. लातूरच्या एका शेल्टर होममध्ये राहणारा आणि ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील चौथीत शिकणारा अरविंदने शाळेच्या पहिल्या दिवशी तब्बल १६ किलोमीटर धावत शाळा गाठली. अवघ्या १० वर्षांच्या मुलाचं केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातून कौतुक केलं जात आहे.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी रचला इतिहास...
अरविंद अवघ्या १० वर्षांचा आहे. तो चौथीत शिकतो. वंचित आणि गरजू मुलांसाठी काम करणाऱ्या माणूस प्रतिष्ठानकडून चालविलं जाणारं शेल्टर होम 'माझं घर' येथे अरविंद राहतो. सोमवारी, १५ जून रोजी नव्या शैक्षणिक सत्राचा पहिला दिवस होता. आपल्या शाळेचा पहिला दिवस स्मरणीय करण्यासाठी अरविंद सकाळी ८ वाजला शेल्टर होमपासून धावतच निघाला. लातूरच्या जुन्या औसा रोडवर श्री लाल बहादूर शास्त्री शाळेपर्यंत तब्बल १६ किलोमीटरचं अंतर धावत पार केलं. या ऐतिहासिक आणि साहसी धावाला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी परिसरातील स्थानिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या अनोख्या उपक्रमाचा उद्देश मुलांना मोबाइलपासून दूर ठेवून पुन्हा खेळाच्या मैदानांकडे आणि पुस्तकांकडे आणणे हा आहे.
ऊस कामगाराच्या घरात जन्म, तरीही उत्तूंग ध्येय...
अरविंदचा जन्म एक अत्यंत गरीब घरात झाला. ऊसतोड कामगाराच्या घरातील सर्व त्रास त्याला माहित आहेत. ऊसतोड कामगार कामानिमित्त गाव सोडून दुसरीकडे जातात. अशावेळी मुलाच्या शाळेचा मोठा प्रश्न असतो. अशा मुलांना शिक्षण देण्याचं काम अनेक सामाजिक संस्था करतात. माझं घरदेखील त्यातील एक भाग. भटके विमुक्त, प्रवासी मजूर, शेतकरी आत्महत्या यासारख्या कुटुंबातील मुलांना आधार देणं आणि मुख्य प्रवाहाशी जोडण्याचं काम या संस्था करीत असतात.
१६ किलोमीटर धावण्याचा हेतू काय आहे?
आजकालची मुलं उठताच मोबाइल शोधतात. अरविंदची ही धाव समाजाला एक मोठा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. लहान मुलांनी मोबाइलच्या व्यसनापासून दूर राहावं आणि मैदानी खेळ, फिजिकल फिटनेसकडे लक्ष द्यावं हा यामागील उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. अरविंद शाळेत पोहोचताच स्थानिक आणि शाळा व्यवस्थापनाने त्याचं जोरदार स्वागत केलं. त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. स्थानिक लोकांच्या मते, अरविंदचे यश केवळ एक शर्यत नसून ते स्वावलंबन आणि आत्मसन्मानाचं जिवंत प्रतीक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world