- बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव सीमेवर ट्रक आणि अवजड वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्यचा व्हिडीओ
- समृद्धी महामार्गावर वाहने थांबवणे कायदेशीर गुन्हा असूनही आरटीओ विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
- अनधिकृत फळ विक्री आणि अवैध दारू विक्रीचे प्रकार वाढल्याने महामार्गावर सुरक्षा प्रश्न गंभीरपणे समोर आले आहेत
अमोल सराफ
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सध्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव सीमेवर ट्रक आणि अवजड वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महामार्गावर वाहने उभी करणे हा कायदेशीर गुन्हा असतानाही, या नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे. सोशल मीडियावर या रांगांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मात्र आरटीओ (RTO) विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या आधी ही समृद्धी महामार्गाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते.
या महामार्गावर केवळ ट्रकच्या रांगाच नाहीत, तर इतर अवैध प्रकारांनीही डोके वर काढले आहे. सीमेवर अनधिकृत फळ विक्रीसाठी चालक आपली वाहने थांबवतात. ज्यामुळे वेगाने येणाऱ्या इतर वाहनांना अचानक ब्रेक लावावा लागतो. याशिवाय, परिसरात अवैध दारू विक्रीचे रॅकेट आणि प्रवाशांना लुटण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एका ट्रकच्या धडकेमुळे 2 प्रवासी गंभीर जखमी झाले होते. वेगवान महामार्गावर अशा प्रकारे अनधिकृत पार्किंगमुळे मागून येणाऱ्या वाहनांचा भीषण अपघात होण्याची शक्यता 100 टक्क्यांनी वाढली आहे.
शासनाकडून समृद्धी महामार्गाच्या देखभालीसाठी आणि डागडुजीसाठी वारंवार करोडो रुपयांचा खर्च केला जातो. अनेकदा दुरुस्तीच्या नावाखाली हा मार्ग वाहतुकीसाठी बंदही ठेवला जातो. मात्र, कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था आणि अवैध धंद्यांवर वचक बसवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. यापूर्वी एनडीटीव्हीने फळ विक्रीचा मुद्दा लावून धरल्यानंतर त्याचे पडसाद थेट विधानसभेत उमटले होते, मात्र तरीही परिस्थिती 'जैसे थे' आहे. ही परिस्थिती बदलली नाही तर इथं अपघात होण्याची शक्यता वाढण्याची भिती आहे. त्यामुळे इथं वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे.
"आम्ही घरून सुरक्षित प्रवासाची खात्री घेऊन निघतो, पण महामार्गावरील ही परिस्थिती जीवघेणी आहे," अशा भावना प्रवासी व्यक्त करत आहेत. आरटीओ आणि महामार्ग पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवून अनधिकृतपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. मोठा अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने झोपेतून जागे व्हावे, असा सूर उमटत आहे. या गोष्टी वारंवार होताना दिसत आहे. त्यामुळे आता तरी याला पायबंद बसेल का अशी विचारणा स्थानिक करत आहे. की मोठ्या अपघाताची प्रशासन वाट पाहाणार आहे असा ही सुर निघत आहे.