राहुल तपासे, प्रतिनिधी
Satara News : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये आज कडकडीत बंद पाहायला मिळत आहे. सुरूर–वाई–पाचगणी–महाबळेश्वर–पोलादपूर या महत्त्वाच्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्तेकामामुळे प्रदूषण वाढत असल्याचं दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे रस्ते काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. याविरोधात पाचगणी आणि महाबळेश्वरमधील नागरिकांकडून बंद पुकारण्यात आला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून या रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या बैठकीत आज 8 मार्च रोजी महाबळेश्वर आणि पाचगणी बंदची हाक देण्यात आली होती.
या बंदला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही शहरांमध्ये सकाळपासूनच अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली असून नागरिकही आंदोलनात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे शनिवार-रविवारी नेहमीच पर्यटकांनी गजबजून जाणारे महाबळेश्वर आणि पाचगणी आज मात्र या बंदच्या पार्श्वभूमीवर शांत दिसत आहेत. पर्यटकांची वर्दळ कमी झाल्याने या पर्यटनस्थळांवर अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, सुरूर–वाई–पाचगणी–महाबळेश्वर–पोलादपूर हा महत्त्वाचा पर्यटन मार्ग तातडीने पूर्ण करावा आणि रस्त्याचे काम दर्जेदार करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान सोमवार, ९ मार्चपासून सर्वत्र जैसे थे परिस्थिती असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world