राहुल तपासे, प्रतिनिधी
Satara News : साताऱ्यातील जावळी तालुक्यात १४ फेब्रुवारी रोजी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. अखेर या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुलीनेच अपहरणाचा बनाव रचल्याचं समोर आलं आहे. ज्या कारणासाठी हा बनाव रचण्यात आला ते पाहून अनेकांना धक्का बसला.
अल्पवयीन मुलीनेच रचला बनाव...
साताऱ्यातील जावळी तालुक्यात गाजलेल्या कथित अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून हे अपहरण नसून भीतीपोटी रचलेला बनाव असल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे. मेढा पोलीस ठाण्याने अवघ्या दोन दिवसांत तपास पूर्ण करत या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर आणली. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एक अल्पवयीन तरुणी १४ फेब्रुवारी रोजी आपल्या मित्रासोबत पाचगणी येथे फिरण्यासाठी गेली होती. दरम्यान दुचाकी घसरून अपघात झाला आणि ती किरकोळ जखमी झाली. आता घरी काय सांगायचं या भीतीने संबंधित तरुणीने थेट पुणे गाठलं. त्यानंतर तिने कुटुंबीयांना फोन करून अपहरण झाल्याची माहिती दिली.
पोलीस ठाण्यात तक्रार...
अल्पवयीन मुलीने आपल्या घरी फोन करुन तिचं अपहरण झाल्याची माहिती दिली. या फोननंतर पालकांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशन आणि इतर तांत्रिक तपासाच्या आधारे सखोल चौकशी केली. यानंतर मात्र अपहरणाचा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचं निष्पन्न झालं. याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी सांगितलं की, या प्रकरणात कोणतंही अपहरण झालेलं नाही. भीतीपोटी मुलीने चुकीची माहिती दिली होती. तपास पूर्ण झाला असून अफवांवर विश्वास ठेवू नये.' मेढा पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे या प्रकरणातील संभ्रम दूर झाला असून तालुक्यात पसरलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world