
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर झटका- हलालचा वाद, धार्मिक तेढ आणि हिंसाचाराच्या घटनांनी महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले आहे. याचेच पडसाद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पडल्याचे पाहायला मिळाले. भाजप मंत्री नितेश राणे यांनी औरंगजेबाची कबर तसेच झटका- हलालवरुन आक्रमक भूमिका घेतली होती. या सगळ्या प्रकरणावरुन आज ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांसह राणेंवर जोरदार हल्लाबोल केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले अनिल परब?
"भारताची राज्यघटना ही या देशात राहणाऱ्या प्रत्येकाला जगण्याचा, राहण्याचा, खाण्याचा हक्क देते. घटनेचा मूळ पाया हा समानतेचा आहे. मी काय खायचं, कसं वागायचं हा अधिकार माझा आहे. हल्ली मी मांसाहार खायचा नाही आणि खात असेल तर मला सोसायटीत राहण्याचा अधिकार नाही, हा अधिकार कोणी दिला. मटण झटक्याचं खायचं की हलालचं खायचं हेदेखील आता मंत्री ठरवायला लागले, हा कायदा कोणी आणला. हे काय सुरु आहे?" असा सवाल उपस्थित करत अनिल परब यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला.
तसेच" मंत्री उठतात आणि सांगतात मल्हार असेल तरच खायचं. तुम्ही काय करताय? मी देखील हिंदू आहे मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. माझ्या इथे सोसायटीत एक नेपाळी वॉचमन आहे रात्रभर ओरडत असतो जागते रहो.. त्याला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. असाच एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय, त्याला असं वाटतं त्याच्यामुळेच हिंदू धर्म टिकलाय, त्याचा असा समज झाला आहे. हल्ली शाल वगेरे घेऊन फिरतो. त्यांच्या जिवावर नाही, हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत," असेही अनिल परब म्हणाले.
नक्की वाचा- CM Fadnavis : "विरोधी पक्षाला प्रशिक्षण द्यायला मी तयार आहे", CM फडणवीस विरोधकांवर बरसले)
"तेवढी ताकद आमच्यात आहे. पण स्वत:च्या धर्माचे रक्षण करताना दुसऱ्यांच्या धर्मावर जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही, याची काळजी घ्यायला मला शिकवले आहे. ज्या घटनेने मला अधिकार दिलेत, त्या अधिकाऱ्यांची पायमल्ली करण्याचा अधिकार ना विरोधक म्हणून मला आहे ना विरोधकांना आहे," असे म्हणत अनिल परब यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world