
Ganpati Visarjan 2025: शनिवारी देशभरात गणपती विसर्जनाचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळाला. 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर राज्यभरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. दुसरीकडे मुंबई, पुण्यामध्ये अद्यापही विसर्जन मिरवणुका सुरुच आहेत. एकीकडे मोठ्या भक्तीभावाने लाडक्या गणरायाला निरोप दिला जात असतानाच काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत ज्यामुळे बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याला गालबोट लागले आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक इथे गणेश विसर्जनादरम्यान दोन युवकांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.ठिकठिकाणच्या विहिरी तलाव नद्या याठिकाणी विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. अशातच पुणे जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरातून याविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूरमध्येही विसर्जन मिरवणुकीवेळी दुर्घटना घडली आहे. गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना इराई नदीवरील भटाडी पुलावर घडली. दीक्षांत मोडक (१८) असे मृतक युवकाचे नाव असून तो चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर येथील रहिवासी आहे. प्रशासना कडून युवकाचे मृतदेह शेधण्याचं काम सुरू आहे.
पिंपरी चिंचवडीत तिघांचा मृत्यू
शनिवारी (दि. ६ सप्टेंबर) वाकी गावाजवळील भामा नदीत प्रियदर्शन शाळेजवळ अभिषेक संजय भाकरे (वय २१, रा. कोयाळी) व आनंद जयस्वाल (वय २८, रा. उत्तर प्रदेश) हे विसर्जनासाठी गेले असता पाण्यात वाहून गेले. त्यापैकी एका युवकाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध फायर ब्रिगेड पथकाकडून सुरू आहे. याच दिवशी शेल पिंपळगाव येथे रवींद्र वासुदेव चौधरी (वय ४५) हे गणेश विसर्जन करण्यासाठी गेले असता भामा नदीत बुडाले. बिरदवडी येथे संदेश पोपट निकम (वय ३५) हा विहिरीत विसर्जन करताना तोल जाऊन पडला व बुडाला. घटनेनंतर तातडीने एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. त्यांच्या पथकाने मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी चाकण येथे नेला आहे.
अकोल्यात अपघातात एकाचा मृत्यू
अकोल्यातील पातूर-अकोला रोडवर गणेश विसर्जनानंतर एक भीषण अपघात झाला. जय बजरंग गणेश उत्सव मंडळाचे सदस्य विसर्जन करून परतत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात चरण अंधारे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल, विनोद डांगे आणि विक्की माळी हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातातील सर्वजण अकोल्यातील शिवसेना वसाहत गाडगे नगर मधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दुचाकी आणि चार चाकी वाहनाचा मोठा अपघात झाल्याने दुचाकी गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world