Mumbai Local Central Railway Mega Block: लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने बदलापूर आणि पुढील स्थानकादरम्यान उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मध्य रेल्वेने ११ दिवसांचा ब्लॉक' जाहीर केला आहे. शुक्रवारपासून (आजपासून) लागू झालेला हा ब्लॉक ३ डिसेंबरपर्यंत मध्यरात्रीच्या वेळी कर्जत-बदलापूर पट्ट्यात लागू असणार आहे. या ब्लॉकमुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या नोकरदारांसह कर्जत, भिवपुरी, नेरळ, शेलू, वांगणी आणि बदलापूर येथील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
कुठे आणि कसा असणार ब्लॉक?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वांगणी (अप लाईन) ते अंबरनाथ आणि अंबरनाथ (डाऊन लाईन) ते वांगणी दरम्यान दररोज मध्यरात्री २ ते ३:३० वाजेपर्यंत दीड तासाचा हा ब्लॉक घेतला जाईल. या वेळेत उड्डाणपुलाच्या फाउंडेशनचे काम आणि ३५० मेट्रिक टनाच्या क्रेनचा वापर करून ३७.२ मीटर लांबीचे दोन स्टील गर्डर बसवण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण केले जाणार आहे. पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हे काम आवश्यक असले तरी, यामुळे रात्रीच्या लोकल सेवेवर थेट परिणाम होणार आहे.
Mumbai News: मुंबईकरांसाठी Good News! पॉड टॅक्सीच्या तिकिटाची कटकट मिटली; प्रवास होणार सुपरफास्ट
लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम:
या ११ दिवसांच्या कालावधीत, मध्यरात्री १२:१२ वाजता सुटणारी CSMT-कर्जत लोकल पूर्णपणे रद्द न होता, ती केवळ अंबरनाथपर्यंतच धावेल. त्यामुळे अंबरनाथ ते कर्जत दरम्यान ही लोकल उपलब्ध नसेल. त्याचप्रमाणे, पहाटे २:३० वाजता कर्जत येथून CSMT साठी सुटणारी लोकल आता कर्जतऐवजी अंबरनाथहून सुटेल. यामुळे रात्रीच्या शिफ्टमधून परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे, कारण त्यांना अंबरनाथहून पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागेल.
एक्सप्रेस गाड्यांचाही खोळंबा
केवळ लोकलच नव्हे, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही यामुळे विस्कळीत होणार आहे. भुवनेश्वर-CSMT कोणार्क एक्स्प्रेस आणि विशाखापट्टणम-LTT एक्स्प्रेस या गाड्यांचा मार्ग वळवण्यात आला आहे. त्या आता कर्जत-पनवेल-दिवा मार्गे धावतील आणि त्यांना पनवेल तसेच ठाणे स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत.
याव्यतिरिक्त, हैदराबाद-CSMT हुसेनसागर एक्स्प्रेस नेरळ येथे २० मिनिटांसाठी थांबवली जाईल, तर होसपेटे-CSMT एक्स्प्रेसला भिवपुरी रोड येथे १० मिनिटांचा थांबा दिला जाईल. या ११ दिवसांच्या ब्लॉकमध्ये प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. पायाभूत सुविधांच्या कामासाठी होणारी गैरसोय प्रवाशांनी समजून घ्यावी, असंही रेल्वेने म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world