Mumbai Rain News: मुंबईच्या पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रभर पडल्यानंतर पहाटे पाऊस थांबला होता, मात्र सकाळ होताच पुन्हा धोधो बरसायला सुरुवात झाली आहे. सकाळी ऑफिसला निघालेल्या मुंबईकरांवर वाहतूक कोंडीचं संकट उभे राहिले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील धिम्या गतीने सुरु आहे. पूर्ण आणि पश्चिम उपनगरात जोरदार पावसाच्या सरी बरसत असू अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
नवी मुंबईत मुसळधार पाऊस, वाहतुकीचा खोळंबा
नवी मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. शिरवणे पुलाखाली गेल्या दोन तासांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे.
Mumbai Rain: मुंबई, ठाण्यात अलर्ट! कोकणातही तुफान पाऊस बरसणार; हवामान विभागाचा मोठा इशारा
बेलापूरकडून वाशीकडे तसेच वाशीकडून बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीत अनेक शाळांच्या बसही अडकल्या असून विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात कोणताही वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात नसल्याने वाहतुकीचे नियमन होत नाही. परिणामी वाहनचालक एकमेकांच्या लेनमध्ये घुसत असल्याने कोंडीत अधिक भर पडत आहे.
सकाळी कार्यालयांकडे निघालेल्या चाकरमान्यांनाही या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला असून अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचणे कठीण झाले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्यासच घराबाहेर पडावे तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world