Nagpur Municiple Election 2026: नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे मिशन 100 नगरसेवक हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काँग्रेसचे सर्व नेते व कार्यकर्ते एकसंध झाले आहेत. नागपूर महानगरपालिका निवडणूकमध्ये आता काँग्रेसमधील कोणतीही बंडखोरी उरलेली नाही. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 10 माजी नगरसेवकांसह सुमारे दीडशे काँग्रेस जणांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले आहेत.
काँग्रेसची एकी, भाजपची वाढली डोकेदुखी..
गेल्या 19 वर्षांनंतर भाजपला महानगरपालिकेतून सत्तेबाहेर काढून काँग्रेसला पुन्हा मिशन हंड्रेड द्वारे सत्तेत आणण्याचा निर्धार बंडखोरांनी अर्ज मागे घेऊन व्यक्त केला आहे, असे बोलले जात आहे. नामनिर्देशन मागे घेणाऱ्या माजी नगरसेवकांमध्ये प्रभाग-२५चे पुरुषोत्तम हजारे, प्रभाग-१०च्या रश्मी उईके, प्रभाग-१२चे अरुण डवरे, प्रभाग-१३चे अमर बागडे, प्रभाग-८च्या आशा उईके, प्रभाग-८चे जिशान मुमताज मोहम्मद इरफान अन्सारी तसेच प्रभाग-१९चे फरहान खान कुर्बान खान यांचा समावेश आहे.
याशिवाय, ओवैस कादरी, पूजा मानमोडे, राजेश तिवारी, मुन्ना वर्मा, सुधाकर तोडसे, माया वानखेडे, फर्दिन गनी खान आदी स्थानीय काँग्रेस नेत्यांनीही आपले अर्ज मागे घेतले. तिकीट वाटपाच्या प्रक्रियेदरम्यानही काँग्रेसमध्ये पूर्ण एकता दिसून आली असून कोणताही वाद निर्माण झाला नाही, असे आता काँग्रेस कडून सांगण्यात येत आहे.
विदर्भातील चारही महापालिकांत भाजपमध्ये अस्वस्थता
महत्त्वाचं म्हणजे विदर्भातील चारही महापालिकांत भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागत असून बालेकिल्ल्यातच अस्वस्थता उघड होत आहे. विदर्भातील सर्वात मोठ्या नागपूर महापालिकेत 151 जागा लढवूनही अनेक माजी नगरसेवक उमेदवारीपासून वंचित आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करुनही ही बंडखोरी रोखण्यात अपयश आले आहे.
नागपूर, चंद्रपूरमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत कित्येक बंडखोर अजून मैदानात असून नेत्यांच्या समजावणी नंतर देखील त्यांनी माघार घेतलीच नाही. अमरावती आणि अकोल्यात मात्र भाजपला बंड शांत करण्यात आंशिक यश मिळाले आहे. चार महापालिकांतील 384 जागांपैकी 331 जागांवर भाजपचे उमेदवार आहेत त्यातील 23 उमेदवार इतर पक्षांतून आलेले आहेत.
बाहेरच्यांना पक्षात घेऊन तिकीट दिल्याने जुन्या निष्ठावंतांवर अन्याय झाल्याचा आरोप होत असून उमेदवारी वाटपावरून पक्षांतर्गत नाराजी आहे. बाहेरून पक्षात आलेले तुपाशी, मात्र घरचे कार्यकर्ते उपाशी या शब्दांत समाज माध्यमांवर भाजप कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. अमरावतीत उद्रेक, बंडखोरांची समजूत काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मैदानात उतरत काही बंडखोरांनी माघार घेतली, मात्र अनेकांनी बंडाचा झेंडा कायम ठेवला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world