Palghar News : खैर तस्करीचे सत्र सुरूच; वनविभागाने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मोठी तस्करी उधळली

खैर तस्करीच्या वाढत्या घटनांमुळे वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या दक्षतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, प्रतिनिधी

Palghar News : पालघर जिल्ह्यात खैर तस्करीचे सत्र सुरूच असून बहिरी फोंडा-जायशेत ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरपाडा भागात रविवारी रात्री पुन्हा एकदा मोठी तस्करी उधळण्यात आली. वांद्री धरणाच्या उजव्या कालव्यावरून मुंबई-अहमदाबाद महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांबरोठे गावाच्या हद्दीत वनविभागाने सापळा रचून एक इको कार ताब्यात घेतली.

या कारमधून 30 ते 35 खैराच्या ओंडक्यांची तस्करी केली जात होती. वनविभागाने कार चालकाविरुद्ध वनगुन्हा दाखल केला असून या तस्करीप्रकरणात सामील असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र खैर तस्करीच्या वाढत्या घटनांमुळे वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या दक्षतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Advertisement

13 दिवसांत खैर तस्करीचा तिसरा प्रकार समोर आला आहे. बहिरी फोंडा-जायशेत आणि परिसरात खैर तस्करीची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. मागील १३ दिवसांमध्ये ही तिसरी मोठी घटना असून यापूर्वीही विविध ठिकाणी खैराचे ओंडके आढळून आले होते.

नक्की वाचा - Mumbai News: सीमा शुल्क अधीक्षक CBIच्या जाळ्यात, तब्बल 10 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं

खैर तस्करीच्या नुकत्याच घडलेल्या घटना :


20 जुलै :  रस्त्याच्या मोरी खाली सिमेंट पाईपमध्ये लपवलेले खैराचे ओंडके आढळले
26 जुलै :  नांदगाव (तर्फे मनोर) येथे झाडीत टाकलेले ओंडके सापडले
29 जुलै :  रस्त्यालगत झुडपांमध्ये खैराचे ओंडके आढळले
3 ऑगस्ट : इको कारमधून वाहतूक करताना तस्करी उधळली

खैर तस्करीच्या वाढत्या घटनांमुळे वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या दक्षतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,या प्रकरणात एक संपूर्ण साखळी कार्यरत आहे. त्यामुळे खैर तस्करी करणार्‍या टोळ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Advertisement