मनोज सातवी, पालघर:
Palghar News: मोखाडा येथे मुलीच्या लग्नसोहळ्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. मुलीच्या विवाहाच्या दिवशीच वडिलांचे निधन झाल्याने आनंदाच्या वातावरणावर दुःखाची छाया पसरली. मात्र ठरलेला मुहूर्त आणि मंडपात जमलेले पाहुणे यामुळे नातेवाईकांनी दुःख मनात ठेवत लग्नसोहळा पार पाडला. मुलीच्या डोक्यावर अक्षता पडण्याआधीच वडिलांची सावली हरपल्याने, संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
लेकीच्या लग्नात पित्याचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, मोखाडा तालुक्यात एका मुलीच्या लग्नसोहळ्यात अत्यंत वेदनादायी घटना घडली असून, मुलीच्या विवाहाच्या दिवशीच वडिलांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दत्तात्रय उबाळे (६०) यांच्या तिसऱ्या कन्या हर्षदा हिचा विवाह १० मे रोजी पार पडत असताना, लग्नाच्या तयारीत धावपळ करताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली.
सुरुवातीला त्यांना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती अधिक खालावल्याने नाशिक येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ही दुःखद बातमी कुटुंबीयांपर्यंत पोहोचली असली तरी विवाहाची वेळ जवळ आल्याने आणि सर्व पाहुणे उपस्थित असल्याने, वधूला धक्का बसू नये म्हणून वडील उपचार घेत असल्याचे सांगत विवाह विधी पार पाडण्यात आले.
लग्नघरात शोककळा
दत्तात्रय उबाळे हे तहसील कार्यालयातून सेवानिवृत्त झाले होते आणि आपल्या चार मुलींसाठी त्यांनी आयुष्यभर मेहनत घेतली होती. गेल्या महिनाभरापासून मुलीच्या लग्नाची तयारी ते उत्साहाने करत होते. हळदी समारंभातही त्यांनी आनंदाने सहभाग घेतला होता. मात्र मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी तिच्या डोक्यावरची वडिलांची सावली कायमची हरपली. उबाळे यांच्या निधनाने लग्नघरातील आनंदाचे वातावरण क्षणात शोकाकुल झाले असून, नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे हृदयस्पर्शी चित्र पाहायला मिळाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world