- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले
- अजित पवारांनी विठ्ठल मंदिरासाठी ७३ कोटी रुपयांचा निधी दिला होता असं सुनेत्रा पवारांनी सांगितलं
- वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनासाठी कोणतीही अडचण या पुढे येणार नाही असं ही त्या म्हणाल्या
संकेत कुलकर्णी
आषाढी वारीची तयारी सगळीकडे सुरू आहे. वारकऱ्यांना विठूरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. शिवाय तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या आठवणी जागवल्या. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची इतकीच इच्छा असते की कुठल्याही मार्गाने विठ्ठलाचे दर्शन व्हावे. काही वारकरी मुखदर्शन घेतात. काही जण चरण दर्शन घेतात. तर काही जण शिखर दर्शन घेतात. ही बाब अजितदादांना माहिती होती. म्हणूनच त्यांनी विठ्ठल मंदिराला 73 कोटी रुपयांचा निधी दिला होता असं यावेळी सुनेत्रा पवारांनी सांगितलं. शिवाय त्या अजित पवारांच्या आठवणीत भावूक झालेल्या ही दिसल्या.
वारकऱ्यांच्या विठ्ठलाचं दर्शन सहज आणि लवकर व्हावं यासाठी अजित पवारांनी प्रयत्न केले होते. असं ही त्यांनी सांगितलं. त्यासाठी निधी ही दिला होता. त्या निधीतून योग्य यंत्रणा उभी राहीला आहे. आता दर्शनाची व्यवस्था अजितदादांच्या निधीतून होत आहे. याबाबत आपल्याला समाधान आहे. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी तत्कालीन परिस्थितीत अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी निधी दिला होता. हीच आठवण सुनेत्रा पवार यांनी बोलून दाखवली.
अजित पवारांनी जो निधी दिला त्यातून झालेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढे त्यांनी विठ्ठलाकडे साकडे ही घातले. राज्याला अलनिनोच्या संकटापासून दूर कर. बळीराजाला सुखी करण्यासाठी पाऊस पडू दे. असं साकडं त्यांनी घातलं. विठ्ठल दर्शनासह मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामाची सुनेत्रा पवार यांनी यावेळी पाहणी केली. तसेच यंदाची वारी सुखकर होण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. वारकऱ्यांना वारीत कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. शिवाय विठ्ठल दर्शन ही सहज आणि सुलभ होईल असं त्यांनी स्पष्ट केलं.
वारीची तयारी सध्या जोरात सुरू आहे. काही दिवसातच ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्तान पंढरपूरच्या दिशेने होणार आहे. त्यासाठी प्रशासन ही सज्ज झालं आहे. पुण्यात पालखी मार्ग सर्वात मोठा आहे. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांची संपूर्ण तयारी झाली आहे. तर पंढरपूरमध्ये ही वारकऱ्यांसाठी सर्व सोई सुविधा उपलप्ध करून देण्यावर सरकारचा भर दिसत आहे. यावेळी वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे रहावे लागणार नाही. तशी सोय प्रशासनाकडून करण्यात आली आहे.