Mumbai BMC Elections 2026: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या ठाकरे बंधूंच्या पुनर्मिलनाच्या सोहळ्यावर मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन यांनी अत्यंत बोचरी टीका केली आहे. "दोन भावांच्या वादात शहाण्या माणसाने पडू नये, असे ग्रामीण भागात म्हटले जाते, कारण शेवटी ते दोघे एकत्र येतात आणि दोघेही नाराज होतात. आज माझीही अवस्था तशीच झाली आहे." अशा उपरोधिक शब्दांत महाजन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ही युती कौटुंबिक प्रेमापोटी नसून केवळ मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेसाठी म्हणजेच 'डबलरोटी'साठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नक्की वाचा: टोकाचा विरोध ते गळाभेट, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती आणि पडद्यामागील राजकारण
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे करवलीसारख्या फिरतायत
महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्या गेल्या 25 वर्षांच्या सत्तेचा पाढा वाचताना थेट सवाल उपस्थित केला. "राजेशाही महालात झोपून झोपडीतल्या मराठी माणसाची काळजी करणे ही अजब तऱ्हा आहे. या 25 वर्षांच्या काळात किती मराठी माणसे झोपडपट्टीतून पक्क्या घरात आली, याचा हिशोब जगाला माहिती आहे," अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रहार केला. तसेच, ज्या सुषमा अंधारे यांनी एकेकाळी बाळासाहेबांबद्दल 'म्हातारा' आणि 'थरथरणारे हात' अशी शेलकी विशेषणे वापरली होती, त्या आज या सोहळ्यात 'करवली'सारख्या नटून फिरत असल्याची टीकाही त्यांनी केली.
मराठी माणसाचे काय कल्याण झाले ? महाजनांता सवाल
दोन्ही ठाकरे बंधू हे स्वतः बिल्डर आहेत, त्यांनी बांधलेल्या स्कीममध्ये किती मराठी माणसांना घरे मिळाली याची यादी त्यांनी जाहीर करावी असे महाजन यांनी म्हटले. "मराठी माणसाचा ठेका कोणत्याही एका माणसाकडे नाही. 25 वर्षे तुमची सत्ता होती, त्यात भाजपचाही काही प्रमाणात दोष होता, पण मराठी माणसाचे कल्याण काय झाले, याचा हिशोब द्यावा लागेल, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले. या युतीमुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य नक्कीच वाढेल, पण जनतेचा विश्वास संपादन करणे कठीण असल्याचे त्यांनी सूचित केले.
नक्की वाचा: आंदेकर विरुद्ध कोमकर! आधी टोळी युद्धात भिडले, आता निवडणूक रिंगणात उतरले, पठ्ठ्यांचे पक्ष ही ठरले?
राज ठाकरे राशीद मामूचा प्रचार करणार आहे का ?
महाजन यांनी या युतीतील 'हिंदुत्व' आणि 'मराठी अस्मिता' या मुद्द्यांवरून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "1986 च्या दंगलीतील आरोपी रशीद मामू जेव्हा 'उबाठा' सेनेत येतो, तेव्हा राज ठाकरे त्याचा प्रचार करणार आहेत का? तसेच, तामिळनाडूच्या न्यायाधीशांविरुद्ध महाभियोग चालवण्याच्या निवेदनावर जेव्हा ठाकरेंचे खासदार सही करतात, तेव्हा ते राज ठाकरेंना मान्य आहे का?" असे सवाल त्यांनी विचारले. "जे लोक तुम्हाला मतदान करत नव्हते, ते आज जाळीच्या टोप्या घालून तुमच्या दारात उभे आहेत, हे नेमके कशाचे लक्षण आहे?" असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला.
ठाकरेंचा जीव गोल्डन ट्रँगलमध्ये अडकलाय
प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे यांनाही जुन्या जखमांची आठवण करून दिली. "जेव्हा अमित ठाकरे आजारी होते आणि त्यांचा उपचारासाठी राज ठाकरे परदेशात होते, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक फोडले. ती जखम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती, मग राज ठाकरेंना ती कशी लागली नाही?" असा भावनिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या 'गोल्डन ट्रँगल' (Golden Triangle) मध्येच या दोन्ही नेत्यांचा प्राण अडकला असून, संभाजीनगरमध्ये मनसे आता रिकामी झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world