- कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे
- रायगड किल्ल्यावरील महादरवाजा ते मदार दरम्यान पायरी मार्गावर मोठमोठे दगड आले आहेत
- प्रशासनाने पायरी मार्गाने प्रवास न करण्याचे आवाहन केले असून दगड हटवण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे
मेहबूब जमादार
कोकणात सध्या मान्सूनचं आगमन झालं आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. पहिल्या पावसामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. तर शेतकऱ्यांनी ही सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्यांचा पेरणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. एकेकडे पावसाने दिलासा दिला असला तरी दुसरीकडे मात्र पहिल्याच पावसाने डोकेदुखी वाढवली आहे. रायगड किल्ल्यावरील पायरी मार्ग बंद करण्यात आला आहे. या मार्गावर मोठमोठे दगड आले आहेत. ते दगड आता हटवण्याचे काम सुरू आहे. हा मार्ग बंद झाल्याने रायगडावर जाणाऱ्या भाविकांच्या अडचणी वाढणार आहेत.
रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यात ही दक्षिण रायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याच परिणाम किल्ले रायगडावर दिसून आला आहे. रायगडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर मोठमोठे दगड आले आहेत. त्यामुळे हा पायरी मार्ग सध्या बंद करावा लागला आहे. महा दरवाजा ते मदार दरम्यान मार्गावर दगड आले आहेत. मोठ्या प्रमाणात दगड या मार्गावर आल्यानंतर पायरी मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यानंतर प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. दगड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र पायरी मार्गाने प्रवास न करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. त्यात आता 26 आणि 27 जून रोजी रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. या दिवशी ही शिवभक्त मोठ्या संख्येन रायगडवार येत असतात. मात्र आता पायरी मार्ग बंद झाल्यामुळे रायगडावर पोहचण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. या मार्गावर दगड आल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. हा मार्ग सुस्थितीत यावा या साठी प्रशासन प्रयत्न करत आहे.
दुसरीकडे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मातीचा ढिगारा आल्याची घटना ही समोर आली आहे. पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात ही घटना घडली आहे. पावसामुळे डोंगरावरील माती महामार्गावर आली आहे. त्यामुळे वाहतूकीवर त्याचा थेट परिणाम झाला आहे. या महामार्गावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. शिवाय महामार्गावरील माती हटवण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी दर पावसाळ्यात डोगरावरची माती रस्त्यावर येते. त्यात आता महामार्गाचे काम झाले आहे. अनेक ठिकाणी डोंगर कापले आहेत. त्यामुळे माती रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world