मेहबुब जमादार, प्रतिनिधी
Raigad Ulhas River Flood Video Viral : मागील दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट असून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. पाताळगंगा आणि उल्हास नदीला मोठा पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कर्जत तालुक्यातील उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.नेरळ-कळंब मार्गावरील दहिवली पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कर्जत तालुक्यात उल्हास नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरले आहे.तसेच आषाणे–पोसरी,वावे बेंडसे या भागातील नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ तसेच वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली आहे.ग्रामस्थांनी कोणताही धोका पत्करून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये,असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
"वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करा"
वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे,असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान,मागील वर्षीही याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.त्यावेळी कर्जतमधील मासेमारीसाठी गेलेला एक तरुण उल्हास नदीच्या प्रवाहात वाहून गेला होता.सुदैवाने तो नदीपात्रातील एका झाडाला धरून अडकून राहिल्याने त्याचा जीव वाचविण्यात यश आले होते.
— Naresh Shende (@NareshShen87640) July 5, 2026
विशेष म्हणजे,गतवर्षी उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे दहिवली पुलावरील लोखंडी रेलिंग तुटून वाकले होते.मात्र,आजतागायत संबंधित विभागाकडून त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.रेलिंग अद्यापही धोकादायक अवस्थेत आहेत.महसूल विभाग,आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं आहे.नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world