
कोकणातून पुण्यात जाण्यासाठी वरंध घाट हा सोईचा समजला जातो. कमी वेळात या घाटातून पुण्यात पोहोचता येतं. पण हा घाट अवघडही तेवढाच आहे. वेडी वाकडी वळणं, अरुंद रस्त या मुळे हा घाट तेवढाच धोकादायक ही आहे. पावसाळ्यात तर हा घाट आणखी धोकादायक ठरतो. त्यामुळेच रायगड जिल्हा प्रशासानानं आता 30 सप्टेंबर 2025 पर्यंत हा घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या कालावधी करीता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकी करीता बंद करण्यात आली आहे. याबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांनी केलेल्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय पावसाळ्या मध्ये आयएमडीच्या अतिवृष्टीचा इशारा (High Alert) कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी बंद करण्या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने पहाणी करून निर्णय घेतला आहे.
त्यानुसार नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी मधील राजेवाडी फाटा - महाड - माणगांव - निजामपूर - ताम्हिणी घाट - मुळशी - पिरंगुट - पुणे असा मार्ग वापरावा. तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा- पोलादपूर- खेड- चिपळूण- पाटण- कराड- कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे आता ऑक्टोबरमध्येच वरंध घाट वाहतूकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात तो आता बंद राहाणार आहे. पावसाळ्यात या घाटात दरडी कोसळण्याच्या घटना ही घडतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world