
राज्यात पुन्हा एकदा पावसाचे जोरदार आगमन होणार आहे. 15 जून, 2025 ला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानाचा अलर्ट कायम होता. तर काही भागांत मुसळधार पावसासह विविध घटनांची नोंद झाली आहे. 24 तासांत, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तर अहमदनगर, धुळे, नंदुरबार, पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, सातारा, नाशिक, मुंबई उपनगर आणि जालना जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील 24 तासांसाठी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत 'रेड अलर्ट' कायम राहील. याव्यतिरिक्त, पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. प्रशासनाने NDRF (राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल) आणि SDRF (राज्य आपत्कालीन प्रतिसाद दल) च्या पथकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
* मुंबई: वादळी वाऱ्यामुळे 1 व्यक्ती जखमी.
* सिंधुदुर्ग: वीज कोसळल्याने 1 व्यक्ती जखमी.
* धुळे: वीज कोसळल्याने 1 व्यक्तीचा मृत्यू.
* नाशिक: वीज कोसळल्याने 1 व्यक्तीचा मृत्यू, 2 जनावरे दगावली आणि 2 व्यक्ती जखमी.
* संभाजीनगर: वीज कोसळल्याने 4 व्यक्तींचा मृत्यू, 5 जनावरे दगावली आणि 5 व्यक्ती जखमी.
* नंदुरबार: वीज कोसळल्याने 1 व्यक्तीचा मृत्यू आणि 1 जखमी.
* अमरावती: वीज कोसळल्याने 1 व्यक्तीचा मृत्यू.
गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान
गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये खालील जिल्ह्यांचा समावेश आहे
* रत्नागिरी: 88.1 मि.मी.
* रायगड: 65.3 मि.मी.
* सिंधुदुर्ग: 53.8 मि.मी.
* ठाणे: 29.6 मि.मी.
* यवतमाळ: 17.5 मि.मी.
मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग: 15 जून रोजी तुरळक ते काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची (50-60 किमी प्रतितास) शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये काही तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता आहे. पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता हळूहळू कमी होऊन 17-18 जूनपर्यंत मध्यम होण्याची शक्यता आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक: या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्याची (30-50 किमी प्रतितास) शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात 15 जून रोजी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो.
नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा घाट: या प्रदेशात 15 आणि 16 जून रोजी मुख्यत्वे तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची (40-60 किमी प्रतितास) शक्यता आहे. त्यानंतर पावसाची तीव्रता हळूहळू कमी होईल.
सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती: या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांसाठी मुख्यत्वे मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्याची (30-50 किमी प्रतितास) शक्यता आहे. ज्यात 15 जून रोजी काही ठिकाणी जोरदार पावसाचीही शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world