Ratnagiri Airport: रत्नागिरीकरांचे हक्काच्या विमान प्रवासाचे बहुप्रतिक्षित स्वप्न आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. सध्या या विमानतळाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, पुढील 3 महिन्यांत या विमानतळावरून पहिले व्यावसायिक विमान उड्डाण करेल, अशी घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. भारतीय तटरक्षक दल (कोस्टगार्ड) आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात नुकताच एक महत्त्वाचा सामंजस्य करार झाला असून, यामुळे या प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे.
किती पूर्ण झाले रत्नागिरी विमानतळ?
रत्नागिरी विमानतळाच्या अंतर्गत कामांनी सध्या वेग घेतला असून बहुतांश कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यामध्ये प्रवाशांसाठीच्या पॅसेंजर टर्मिनल इमारतीचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली संरक्षक भिंत 95 टक्के पूर्ण झाली असून, विजेची सर्व आवश्यक कामे 85 ते 90 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहेत.
याशिवाय, वाहनांसाठीचे पार्किंग आणि विमानतळांतर्गत रस्त्यांचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. आमदार किरण सामंत यांनी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत एक विशेष आढावा बैठक घेऊन ही उर्वरित कामे अतिशय जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
( नक्की वाचा : Palghar : हसता हसता रडू आलं! पालघरमधल्या धबधब्यावर अवघ्या 2 मिनिटांत बदललं चित्र, पर्यटकांचा जीव... पाहा VIDEO )
प्रकल्पाचा खर्च आणि वैशिष्ट्ये
सुमारे 25 एकर जागेवर तब्बल 100 कोटी रुपये खर्चातून हा भव्य विमानतळ प्रकल्प पूर्ण होत आहे. व्यावसायिक विमान उड्डाणांसाठी कोस्टगार्डच्या धावपट्टीचा (रनवे) वापर केला जाणार आहे, तर इतर सर्व ऑपरेशन्स हे संरक्षक भिंतीच्या बाहेरील परिसरातून चालणार आहेत.

या विमानतळाची क्षमता 72 आसनी विमानांच्या उड्डाणासाठी योग्य असणार आहे. विशेष म्हणजे, येथे एकाच वेळी 4 विमाने पार्क करण्याची अद्ययावत क्षमता उपलब्ध असेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणच्या, विशेषतः रत्नागिरीच्या पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world