- राहुरी तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे
- बिबट्यांमुळे होणाऱ्या हल्ल्यांमुळे अनेक जण जखमी झाले असून काही लोकांचा मृत्यूही झाला आहे
- स्थानिक शेतकऱ्यांनी वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल करून बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्याची मागणी केली आहे
सुनिल दवंगे
बिबट्याचा वावर अनेक ठिकाणी वाढला आहे. शिवाय मानवी वस्तीत ते सर्रास पणे दिसत आहेत. त्यांचा वावर वाढला असतानाच दुसरीकडे मात्र ते लोकांवर, लहान मुलांवर आणि महिलांवर हल्ले ही करत आहेत. त्यात आतापर्यंत अनेक जण जखमी ही झाले आहेत. तर काहींना आपला जीव ही गमवावा लागला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात ही अशीच काहीशी स्थिती आहे. इथं बिबटाची मोठ्या प्रमाणात दहशत आहे. पण त्यांचा बंदोबस्त होत नाही. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
नक्की वाचा - Beed News: दोन बहिणींच्या अपहरणाचा कट, छोट्या बहिणीचं जबरदस्त धाडस, 'असा' उधळला डाव
राहुरी तालुक्यात बिबट्यांची मोठ्या प्रमाणात दहशत आहे. त्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचा स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे. शिवाय सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा ही आरोप होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधानांकडे याबाबत दाद मागण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मोदीं सोबत पत्रव्यवहार केला आहे.
तालुक्यातल्या तब्बल वीस हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रे पाठवत आपला रोष व्यक्त केला आहे. राहुरी तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल करून बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्याची मागणी करण्यात आली आहे. वीस हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रे पाठवली आहेत. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ही अनोखी मोहीम राबविण्यात आली आहे.