मुंबई: आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गटासह भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटही आता मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरला आहे. 9 जूनपासून ठाकरे गट रस्त्यावर उतरून पालिकेच्या तयारीची सुरुवात करणार असून यासाठी खास रणनितीही तयार करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे गटाकडून रणनीती आखण्यात आली आहे. 9 जूनपासून ठाकरे गट रस्त्यावर उतरून पालिकेच्या तयारीची सुरुवात करणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने मुलुंड येथील कालिदास सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात युवासेना नेते आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत.
'लढा आपल्या मुंबईचा' याच्या माध्यमातून ठाकरे गट मुंबई महानगर पालिकेच्या प्रचाराचा सुरवात करणार आहे. मुलुंड येथील मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन आदित्य ठाकरे करणार असल्याने मुंबई महानगर पालिकेची निवडणूक ठाकरे गट आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
त्याचबरोबर 9 जूननंतर मुंबईत ठिकठिकाणी विविध प्रश्नांवर ठाकरे गट आंदोलन करणार आहे. मुलुंड येथून सुरवात केल्यानंतर मुंबईतील इतर प्रश्नावर देखील आंदोलन आणि मेळावे लढा आपल्या मुंबईच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये रस्ते घोटाळा, पाणी प्रश्न, राज्य सरकारच्या योजना याचा देखील समावेश असणार आहे. 9 जून रोजी होणाऱ्या मेळाव्यात आदित्य ठाकरे पुढील मेळाव्याचे आणि आंदोलनांची माहिती पदाधिकाऱ्यांना देणार आहेत.
(नक्की वाचा- Maharashtra Politics: 'महायुतीत नाराजीनाट्य, 3 पक्षांचा तमाशा..', ठाकरे गटाची टीका)
दरम्यान, महापालिका निवडणुका तोंडावर असतानाच मनसे- ठाकरे गटाच्या युतीबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरुनच आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी सर्वात मोठे विधान केले आहे. याबाबत दोन्ही भावांनी बोलावं, दोघांकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत, चर्चा करावी.. असे स्पष्ट मत अमित ठाकरेंनी व्यक्त केली आहे.