Who is Satara SP Tushar Doshi? : सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) तुषार दोशी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तुषार दोशी यांचा इतिहास पाहिला तर त्यांच्या नावासोबत अनेक वाद जोडले गेले आहेत. आज 23 मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उभसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांच्या निलंबनाची घोषणा केली. यापूर्वीबी ते अनेकदा वादात अडकले आहेत. २०२३ मध्ये, अंतरवली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराशी कथितरित्या संबंध असल्याच्या आरोपांनंतर मुदत पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली होती.
'जालना लाठीचार्ज' सर्वात मोठा वाद...
तुषार दोशी हे महाराष्ट्र पोलीस दलातील एक अनुभवी अधिकारी मानले जातात. त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी गुन्हे शाखा आणि इतर विशेष विभागांमध्ये आपली सेवा दिली आहे. दोशी यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा वाद 'जालना लाठीचार्ज' प्रकरणाशी संबंधित आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान जालन्यात झालेल्या लाठीहल्ल्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती. त्यावेळी दोशी जालन्याचे पोलीस अधीक्षक होते. या घटनेनंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते, ज्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
सातारा एसपींच्या निलंबनाचे आदेश
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या मोठ्या राड्याचे पडसाद आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहायला मिळाले. शिवसेना नेते मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानपरिषदेमध्ये याच मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आत्तापर्यंत कधीही मंत्र्याला पोलिसांकडून मारहाण झाली नाही. १०-१० पोलिसांनी मला पकडले होते. कोणी कंबरेला, कोणी हाताला धरुन ओढत होते. या राड्यामध्ये मला जखम झाली. पोलीस प्रशासन अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागली, असं शंभुराज देसाई यावेळी म्हणाले.
मंत्र्यांकडून कारवाईची मागणी...
जालन्यातील वादानंतर काही काळ शांततेत गेल्यानंतर त्यांची नियुक्ती सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली. मात्र, साताऱ्यात आल्यानंतरही त्यांच्यासमोर कायदा आणि सुव्यवस्थेची अनेक आव्हाने उभी राहिली. विशेषतः पुसेसावळी येथील जातीय हिंसाचाराची घटना त्यांच्या कार्यकाळात घडली, ज्यामुळे त्यांच्या प्रशासकीय कामावर टीका झाली. एकीकडे विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यावर कारवाईची मागणी करत असताना, दुसरीकडे पोलीस दलातील काही घटक त्यांना एक शिस्तप्रिय अधिकारी मानतात. मात्र, वारंवार होणारे वाद आणि आंदोलकांशी हाताळणी करण्याच्या पद्धतीमुळे ते सतत राजकीय आणि सामाजिक वर्तुळात टीकेचे धनी ठरले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world