अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी
Chandrapur Municipal Corporation News : चंद्रपूर महानगरपालिकेतील महिला व बालकल्याण समिती तसेच झोन समित्यांच्या निवडणुकांत भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. त्याचा थेट फायदा काँग्रेसला झाल्याचं चित्र समोर आले आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेविका संगीता भोयर यांनी विजय मिळवला.12 सदस्यीय समितीत भाजप व काँग्रेसकडे प्रत्येकी 6-6 अशी समान मतसंख्या होती.मात्र,शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका डीलन केळझरकर मतदानाला अनुपस्थित राहिल्याने समीकरण बदलले. परिणामी भोयर यांना 6 मते मिळाली,तर भाजपच्या सुनीता जयस्वाल यांना 5 मतांवर समाधान मानावे लागले.
भाजपने घेतलेली माघार चर्चेचा विषय
जर केळझरकर यांनी मतदान केले असते,तर 6-6 अशी बरोबरी होऊन ‘ईश्वर चिट्ठी'ने निर्णय घेण्याची वेळ आली असती.दरम्यान,केळझरकर यांना सभापतीपदाचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा असून प्रत्यक्षात उमेदवारी जयस्वाल यांना दिल्याने त्यांनी नाराजीपोटी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.दुसरीकडे,झोन क्रमांक 2 आणि 3 च्या निवडणुकांत भाजपने घेतलेली अचानक माघारही चर्चेचा विषय ठरली.
नक्की वाचा >> Dhule News: वृद्धाची एन्ट्री, हात हवेत, एकटीच चालत गेली! 18 वर्षाच्या तरुणीच्या अपहरणाचं चक्रावून टाकणारं CCTV
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय
झोन क्रमांक 2 मधील भाजप उमेदवार ज्योती जीवने आणि झोन क्रमांक 3 मधील उमेदवार जितेश कुळमेथे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला.या निर्णयामागे भाजपमधील सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार गटांतील वाद कारणीभूत असल्याची चर्चा आहे. प्रदेश कार्यालयाकडून झोन क्रमांक 1 साठी रवी लोणकर आणि महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी सुनीता जयस्वाल यांची नावे पाठवण्यात आली होती.ही दोन्ही नावे मुनगंटीवार समर्थक असल्याने जोरगेवार गट नाराज झाला. याच नाराजीतून जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
नक्की वाचा >> Kalyan News: "सत्ता पैसा गुंडगिरी...", कल्याणमध्ये वरुण सरदेसाईंचा शिंदे गटाला इशारा, "मधूर म्हात्रे बेईमान.."
परिणामी झोन क्रमांक २ मधून काँग्रेसच्या वैशाली चंदनखेडे यांची बिनविरोध निवड झाली,तर झोन क्रमांक ३ मधून काँग्रेसचे रामनरेश यादव विजयी झाले.विशेष म्हणजे,झोन क्रमांक 3 मध्ये भाजपकडे 13 विरुद्ध 10 असे स्पष्ट बहुमत असतानाही माघार घ्यावी लागली.या सर्व घडामोडींमुळे चंद्रपूर मनपातील भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली असून आगामी राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.