- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मतदान १२ मे रोजी होणार असून भाजपला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे
- भाजप उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक
- भाजपच्या उमेदवारांत प्रज्ञा सातव यांचे नाव पोटनिवडणुकीसाठी जवळपास निश्चित मानले जात आहे
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 6 जागा येणार आहे. त्यासाठी राज्यभरातून अनेक नेत्यांनी आतापासूनच सेटींग लावली आहे. भाजपच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी आज रात्री 10 वाजता मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यात बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही नावांमुळे तर मोठी पक्षांतर्गत स्पर्धा निर्माण झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, 6 जागांसाठी 12 नावांची सध्या जोरदार चर्चा आहे. यामध्ये प्रज्ञा सातव, माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी यांचा समावेश आहे. पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. उर्वरित 5 जागांसाठी भाजप जातीय आणि प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न करणार आहे.
ही नावे जरी चर्चेत असली तरी भाजपचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ही आपण विधान परिषदेत जावे असे वाटत आहे. बाहेरून पक्षात आलेल्यांना आता तरी संधी नको असा सुर एक गटाचा आहे. त्यातूनच पुन्हा एकदा माधव भंडारी, केवश उपाध्ये या सारख्या नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्टींसमोर काय निर्णय घ्यायचा असा प्रश्न आहे. शिवाय लोकसभा विधानसभा निवडणुकीत अनेकांनी आश्वासने दिली होती त्यांची ही पुर्तता फडणवीस आणि भाजपला करावी लागणार आहे.
विधानपरिषदेच्या 9 नियमित जागा आणि 1 पोटनिवडणूक अशा एकूण 10 जागांसाठी मतदान होईल. 9 जागांसाठी 29 मतांचा कोटा असून पोटनिवडणुकीसाठी 51 टक्के मतांची गरज आहे. महायुतीकडे असलेल्या संख्याबळामुळे १० पैकी ९ जागा जिंकणे त्यांना सोपे जाणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल. उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा), नीलम गोऱ्हे (शिवसेना),शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट), गोपीचंद पडळकर (भाजप),रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप), राजेश राठोड (काँग्रेस), प्रवीण दटके (भाजप),रमेश कराड (भाजप) यांचा कार्यकाळ संपत आहे.
निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026. उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026. मतदानाची तारीख: 12 मे 2026. मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे. मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 13 मे 2026 आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world