
Devendra Fadnavis vs Sharad Pawar : राहुल गांधींच्या 'मतचोरी'च्या आरोपाने सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) एसपी प्रमुख शरद पवार यांनी शनिवारी एक धक्कादायक दावा केला. ते म्हणाले की 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी नवी दिल्लीत त्यांची भेट घेतली होती आणि 288 पैकी 160 मतदारसंघांमध्ये विरोधी पक्षांच्या विजयाची 'हमी' दिली होती. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, त्यांनी त्या दोन व्यक्तींची भेट विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी करून दिली. राहुल गांधींनी भाजप आणि निवडणूक आयोगावर 'मतचोरी'चा आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी हा दावा केला आहे.
शरद पवारांच्या विधानावर फडणवीस काय म्हणाले?
शरद पवारांच्या या विधानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, 'पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यानंतर इतक्या दिवसांनी याची आठवण कशी झाली, हे मला कळत नाही. राहुल गांधी सलीम-जावेद यांच्यासारख्या कथा रचत आहेत आणि त्यांच्या स्क्रिप्टमधून दररोज नवीन बनावट कथा सांगत आहेत.'
( नक्की वाचा : Vikhe vs Thorat : मतदार चोरीवरून विखे-थोरात 'आमने-सामने', शिर्डीतील निकालाचा वाद काय? )
'पवार साहेबही अशा स्थितीत तर नाही ना...'
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रश्न विचारला की, 'पवार साहेबही अशा स्थितीत तर नाहीत ना? राहुल गांधी ईव्हीएमबद्दल बोलत होते. पवार साहेबांनी अनेकदा सांगितले आहे की ईव्हीएमला दोष देणे चुकीचे आहे... आणि आता ते अशा प्रकारे बोलत आहेत, हे राहुल गांधींच्या दौऱ्याचा परिणाम असू शकतो.'
पवार काय म्हणाले होते?
शरद पवार शनिवारी म्हणाले होते की, 'महाराष्ट्रात 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोक नवी दिल्लीत मला भेटले होते. त्यांनी विरोधी पक्षाला (महाविकास आघाडी) 288 पैकी 160 जागा जिंकण्यास मदत करण्याची हमी दिली.' राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) प्रमुखांनी सांगितले, 'मी त्यांना राहुल गांधींना भेटवले. त्यांनी (गांधी) त्या दोन्ही व्यक्तींनी जे काही सांगितले, त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांचेही असेच मत होते की आपण अशा गोष्टींमध्ये पडू नये आणि थेट जनतेकडे जावे.'
पवार यांनी दावा केला की, त्या दोन व्यक्तींनी जे काही सांगितले त्याला त्यांनी फारसे महत्त्व दिले नाही, म्हणून त्यांनी त्यांची नावे आणि संपर्क तपशील ठेवले नाहीत. विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्या, तर त्यांचा मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनुक्रमे 57 आणि 41 जागांवर विजय मिळवला.
विरोधी आघाडी 'महाविकास आघाडी'ने त्यांच्या पराभवासाठी ईव्हीएममधील अनियमितता आणि डेटाच्या छेडछाडीला जबाबदार धरले होते. महाविकास आघाडीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी 30 लोकसभा जागांवर विजय मिळवला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world