Hindi Language Controversy : पहिलीपासून हिंदी भाषेचा तिसरी भाषा म्हणून समावेश करावा या सरकारच्या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी मोर्चाची हाक दिली. राज ठाकरे यांनी पाच जूनला मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर या मोर्चाचे आयोजन केलंय. मनसेकडून मोर्चासाठी सकाळी दहा वाजताची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यांवर दोन ठाकरे बंधूंनी वेगवेगळे मोर्चे काढणं योग्य नसल्याचं सांगत संजय राऊत यांना फोन केला. यानंतर राज ठाकरेंच्याच मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होतील अशी घोषणा संजय राऊत यांच्या माध्यमातून करण्यात आली. मात्र मोर्च्याची वेळ आणि ठिकाणावरून उद्धव ठाकरे यांनी काही सूचना संजय राऊत यांना केल्याच समजतंय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहेत सूचना?
यातील पहिला मुद्दा आहे मोर्चाची वेळ. राज ठाकरे यांच्याकडून सकाळी दहा वाजताची वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र ही वेळ मुंबईकरांना चाकरमान्यांना कामावर जायची वेळ आहे. त्यामुळे जर मोर्चा काढला तर याचा परिणाम वाहतुकीवर होईल. आणि त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना चाकरमान्यांना मोर्चामुळे त्रास होईल. अशी भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे. म्हणूनच मोर्चा सकाळी दहा वाजता न काढता दुपारी अडीच वाजता काढावा अस उद्धव ठाकरे यांचं मत आहे.
या दोन्ही पक्षांमध्ये चर्चिला जाणारा दुसरा मुद्दा आहे मोर्चा निघण्याचं ठिकाण. राज ठाकरेंनी या मोर्चाची सुरुवात मुंबईच्या गिरगाव चौपाटी वरून होईल असं सांगितलंय. तर उद्धव ठाकरेंना हा मोर्चा हुतात्मा स्मारकावरून काढावा असं वाटतंय. ज्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीला सुरुवात झाली, त्याच ठिकाणाहून हिंदीला विरोध व्हावा ही त्या मागची उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. हा मोर्चा हुतात्मा स्मारकावरून हुतात्म्यांना अभिवादन करून सुरू करावा आणि याची सांगता आझाद मैदानात करावी अशा सूचना त्यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना केले आहे.
( नक्की वाचा : Hindi Language Controversy : ठाकरेंकडून टाळी मिळाल्यानंतर मनसेचा काँग्रेसकडं हात! नवा ट्विस्ट येणार? )
कसा निघणार तोडगा?
आता यावर दोन्ही पक्षांच्या भेटीगाठीचे सत्र सुरू झाले आहे. उबाठाकडून संजय राऊत, वरूण सरदेसाई, सचिन अहिर यांच्यावर मोर्चाच्या नियोजनाच्या चर्चेची जबाबदारी आहे. तर मनसेकडून बाळ नांदगावकर, संदीप देशपांडे, अभिजीत पानसे हे उबाठाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी सुचवलेल्या वेळ किंवा मोर्चाच्या सुरुवातीचे ठिकाण यापैकी एखाद्या गोष्टीवर एकमत न झाल्यास पुढे काय हा प्रश्न देखील चर्चा करणाऱ्या नेत्यांना पडलाय.