- महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सात जागांसाठी निवडणूक होणार आहे.
- नवनीत राणांना राज्यसभेसाठी उमेदवारी मिळणार नाही, त्याऐवजी माया ईवनाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे
- नवनीत राणांनी भाजपसाठी विधानसभा व महापालिका निवडणुकीत सक्रिय काम केले पण नंतर पक्षविरोधी भूमिका घेतली
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सात जागांसाठी निवडणूक होत आहे. यातील चार जागा या भाजपच्या निवडून येणार आहेत. तर दोन जागा या मित्रपक्षाच्या असतील. एक जागा ही मविआला मिळणार आहे. भाजपच्या कोट्यातील चार जागांसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या चार जागांसाठी अनेक जण इच्छुक होते. त्यांनी त्यासाठी फिल्डींग ही लावली होती. पण भाजपने धक्कातंत्र वापरत सर्वांनाच धक्का दिला आहे. सर्वात मोठा धक्का हा माजी खासदार नवनीत राणा यांच्यासाठी होता. त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी मिळणार अशी हवा होती. पण त्यांच्या ऐवजी नागपूरच्या माजी महापौर माया ईवनाते यांना उमेदवारी देण्यात आली. राणा यांची उमेदवारी शेवटच्या क्षणी कट झाली अशी चर्चा आहे.
नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर ही त्या भाजपसाठी जिल्ह्यात सक्रीय होत्या. विधानसभेला त्यांनी जिल्हा पिंजून काढला. त्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीत ही त्या सक्रीय होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही त्यांच्या कामाची दखल घेतली होती. शिवाय त्यांचा उल्लेख आजी खासदार असा ही केला होता. नवनीत राणा माजीच्या आजी लवकरच होतील असं ही फडणवीस म्हटले होते. त्यापासूनच राणा या राज्यसभेवर जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. रिक्त होत असलेल्या सात जागांपैकी एक जागा राणांची असेल असं बोललं जात होते. पण एक चुक राणा यांना नडली अन् त्याचं तिकीट शेवटच्या क्षणी कापलं गेलं. त्यांचं राज्यसभेत जाण्याचं स्वप्न भंगलं.
विधानसभा, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत नवनीत राणा यांनी भाजपचे काम केले. भाजप उमेदवारांसाठी त्यांनी प्रचार ही केला. पण महापालिका निवडणुकीत नवनीत राणा यांनी भाजपच्या उमेदवारा विरोधातच प्रचार केला. शिवाय पती आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. भाजपच्या बालेकिल्ल्यात जावून त्यांनी भाजप उमेदवाराला पराभूत करण्यास सांगितले होते. त्यांच्या या कृतीवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी टिकेची झोड उठवली होती. राण या पक्षा पेक्षा मोठ्या नाहीत असं ही भाजपचे स्थानिक नेते बोलत होते.
त्यांना समज देवून ही राणा यांनी पक्षाश्रेष्ठींचे काही ऐकले नाही. उलट युवा स्वाभिमानच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यांच्या या कृतीला खासदार अनिल बोंडे यांनी जोरदार विरोध केला. भाजपच्या स्थानिक नेत्यांचा पहिल्यापासून नवनीत राणा यांना विरोध होता. लोकसभा निवडणुकीत तो दिसून ही आला होता. तरी ही त्यांना उमेदवारी दिली गेली. त्यानंतर त्यांनी भाजप विरोधातच भूमीका घेतली. ही गोष्ट नवनीत राणा यांना भोवली. ते पक्षश्रेष्ठींना पटली नाही. शेवटी त्यांचा पत्ता कट झाला. भाजपमध्ये असून ही त्या पतीच्या युवा स्वाभिमानकडे जास्त झुकलेल्या आढळल्या. शिवाय अमरावतीत आपण म्हणजेच भाजप असा समज त्यांना झाला होता अशी टिका स्थानिक भाजप नेते सांगत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी त्यांच्या विरोधात गेल्या. अखेर त्यांच्या नशिबी पुन्हा एकदा प्रतिक्षाच आली आहे.
राज्यसभेवर वर्णी लागेल अशी अपेक्षा नवनीत राणांना होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्या भाऊ मानतात. देवा भाऊने दिलेला शब्द ते पाळतील असं ही त्या बोलल्या होत्या. पण त्यांना यावेळी डावलण्यात आलं. उमेदवारी न मिळाल्या मुळे नवनीत राणा नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ ही बनवला आहे. त्यात त्या म्हणतात “संघर्ष करना मेरे लिए कोई नई बात नहीं है। मैं किसी भी मोड़ से नई शुरुआत कर सकती हूँ,” असे नवनीत राणांनी आपल्या स्टेटसमध्ये म्हटले आहे. या स्टेटसमधूनच त्यांनी आपल्या नाराजीला वाट करून दिली आहे. दुसरीकडे भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी आपले धक्कातंत्र सुरूच ठेवले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world