
राष्ट्रवादी काँग्रेसने सध्या महाराष्ट्रा बाहेर पक्ष विस्ताराच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहे. त्यानुसार पक्षाची अधिवेशने आयोजित केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केरळमध्ये पक्षाचे अधिवेशन झाले. 22 फेब्रुवारी राजेंद्र मैदान, एर्नाकुलम येथे हे अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात राज्यातील राजकीय परिस्थिती, पक्षाच्या भविष्यातील दिशा आणि महत्त्वाच्या धोरणांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव तसेच राज्याचे अध्यक्ष एन.ए.मोहम्मद कुट्टी उपस्थित होते. केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एनडीए आघाडीचा भाग आहे. नागालँडमध्ये पार्टीचे नऊ आमदार आहेत. अरुणाचल प्रदेशातही आमदार आहेत. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसने 30 जागांवर भाजपच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये परिस्थितीनुसार पार्टीची भूमिका असते, असं त्यांनी स्पष्ट केलं.
केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच विशिष्ट मूल्ये जपली आहेत आणि ती कायम राहतील. केरळमध्ये सध्या पक्ष कोणत्याही आघाडीचा भाग नसून स्वतंत्र भूमिका घेत आहे. भविष्यात अन्य कोणत्या आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय राज्य स्तरावर घेतला जाईल. असे पटेल माध्यमांशी बोलताना म्हणाले. केरळमध्ये भाजप बरोबर जायचं की नाही याबाबत मात्र पटेल यांनी कोणतेही वक्तव्य केलं नाही.
सध्या पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष मजबूत करणे आहे. राज्याचे अध्यक्ष पी. सी. चाको यांच्या नेतृत्वाखाली या राज्य अधिवेशनाला नवी ऊर्जा देईल, असेही प्रफुल्ल पटेल यांनी नमूद केले. या परिषदेत पक्षाच्या आगामी धोरणांबाबत तसेच राजकीय रणनीतीबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धोरणात्मक आखणी केली. या अधिवेशनाच्या तयारीचा भाग म्हणून फेब्रुवारी 11 ते 17 दरम्यान कासरगोड ते तिरुवनंतपुरम पर्यंत जनसंवाद दौरा राबविण्यात आला होता. या दौऱ्यात स्थानिक नागरिकांशी संवाद साधून पक्षाच्या कार्यप्रणालीबाबत जनजागृती करण्यात आली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world