NCP foundation day celebration in pune : राष्ट्रवादी काँग्रेसचा 10 जून रोजी स्थापना दिवस असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, स्थापना दिनाचा कार्यक्रम दणक्यात साजरा करणार आहेत. विशेष बाब ही आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हा कार्यक्रम पुण्यात करणार आहे. दोन्हीही पक्षांचा मेळावा पुण्यातच होत असताना सगळ्यांचे लक्ष मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे असणार आहे. याचं कारण म्हणजे शरद पवार आणि त्यांच्या कन्या तसेच सुप्रिया सुळे नेमकी यांची भूमिका. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोरात आहेत. शरद पवारांनी यासंदर्भातील जो काही निर्णय घ्यायचा तो सुप्रिया सुळे घेतील असे जाहीर केले होते. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष विशेष करून सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेकडे असणार आहे.
पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला मानला जायचा. खासकरून ग्रामीण भागात शरद पवारांचे प्राबल्य आहे. शरद पवारांसोबत अजित पवारांचेही राजकारण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या तालुक्यातून अधिक बळकट होत गेले. एकेकाळी पुणे महापालिका काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांच्या ताब्यात होती. ती महापालिका अजित पवारांनी भाजपला मदतीला घेत काबीज केली होती. कालांतराने भाजपाचे वर्चस्व पुण्याच्या शहरी भागांमध्ये वाढलं. पिंपरी चिंचवड महापालिकेत सुद्धा अजित पवारांच्या हाती असणारी सत्ता भाजपाने खेचून आणली होती.
नक्की वाचा :आषाढी एकादशीपर्यंत राष्ट्रवादीमध्ये मोठी घडामोड घडणार? 'या' नेत्याच्या संकेतामुळे एकच खळबळ
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर अजित पवारांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अधिक यश कसे मिळवता येईल यासाठी ते प्रयत्नशील आहेत. कदाचित हेच कारण असावे ज्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यामध्येच स्थापना दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले असावे. सध्या राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का ? आणि पवार -सुळे बंधू भगिनी एकत्र येणार का याची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकते असा कयास बांधला जात आहे.
नक्की वाचा :शरद पवार गटात मतभेद? जयंत पाटलांवर तरुण नेते नाराज असल्याची सूत्रांची माहिती
केंद्रातील भाजप सरकारवर तुटून पडणाऱ्या सुप्रिया सुळे यांचा गेल्या काही दिवसातील सूर मवाळ झाल्याचे जाणवू लागले आहे. खासकरून पहलगाम हल्ल्यानंतर इंडिया आघाडी एक भूमिका मांडत असताना सुप्रिया सुळे यांनी मांडलेली भूमिका ही मोदी सरकारला पाठिंबा देणारी होती. भारताची बाजू विविध देशांना समजावून सांगण्यासाठी नेमण्यात आलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे यांचाही समावेश होता. सुप्रिया यांनी विविध देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका भक्कमपणे मांडली होती. मविआतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना(उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे सत्ताधाऱ्यांना झोडपून काढत असताना सुप्रिया सुळे मात्र देशाच्या सुरक्षेसंदर्भात कोणी राजकारण करू नये अशी भूमिका मांडत होत्या.
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणुकांवरून निडणूक आयोगाला लक्ष्य केले होते. याही प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी म्हणावी तशी आक्रमक भूमिका घेतली नाही अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळे यांच्या या मवाळ भूमिकेचा अर्थ नेमका काय आहे असा प्रश्न विचारला जात असतानाच मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे. साहजिकच आहे सुप्रिया सुळे महाराष्ट्रासह देशाचे राजकारण आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत काय बोलतात याची उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविक आहे.