शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्य सध्या वादाचा विषय ठरत आहे. नारायण राणे हे असेच मोठे झाले नाहीत. त्यांनी त्यासाठी मर्डरही केले आहेत. असं वादग्रस्त वक्तव्य गोगावले यांनी केलं. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य राणेंच्या सिंधुदुर्गात जावून केलं आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांना आयतं कोलीत हातात मिळालं आहे. या वक्तव्यानंतर मंत्री नितेश राणे यांनीही गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भरत गोगावलेंचे ते भाषण आपण ऐकले नाही असं नितेश राणे म्हणाले. पण ते जे काही बोलले त्यावर त्यांनी प्रतिक्रीय मात्र नक्की दिली आहे. नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री राहीले आहेत. त्यांच्यावर कुठल्या ही पोलिस स्थानकात मर्डरची केस नाही. त्यामुळे गोगावले असं का म्हणाले माहित नाही. पण ते मला कॅबिनेट बैठकीत भेटणार आहेत. त्यावेळी ते माझ्या खांद्याला खांदा लावून उभे असतील. त्यावेळी त्यांच्या ज्ञानात आपण अधिक भर टाकू. त्यांना कदाचित पूर्ण माहिती नसेल असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही यावरून राणेंना फटकारले आहे. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री होतं. ते पंतप्रधानांच्या बाजूला बसतात. अशा स्थितीत पंतप्रधानांच्या सुरक्षेला ही धोका निर्माण झाला आहे. राज्याचा एक जबाबदार मंत्री, माजी केंद्रीय मंत्र्याबद्दल बोलतो अशा स्थितीत त्याची चौकशी झाली पाहीजे. गृहमंत्र्यांनी त्यांची चौकशी करणे गजरेचे आहे. सध्या मुख्यमंत्री हतबल आहेत का? असा प्रश्नही या निमित्ताने दानवे यांनी केला आहे.
तर राणेंचे कट्टर विरोधत असलेल्या वैभव नाईक यांनीही ही संधी सोडलेली नाही. भरत गोगावले जे काही बोलले ते योग्य आणि खरं बोलले. मी त्यांच्या बरोबर काम केलं आहे. त्यामुळे गोगावलेंच्या मनात एक आणि ओठात एक असं नाही. जे त्यांच्या मनात आहे तेच ते बोलतात असं नाईक म्हणाले. त्यामुळे राणेंचा इतिहास काय आहे हे सर्वांनाच माहित आहे. पण आता गोगावले बोलल्याने हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. गोगावले हे राज्याचे जबाबदार मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्व असल्याचं ही ते म्हणाले.