अविनाश पवार
शरद पवार यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळे ते राज्यसभेवर परत जाणार की नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होत्या. पवार निवृत्त होणार असं ही बोललं जात होतं. पण सर्वांचेच अंदाज शरद पवारांनी चुकवले. शिवाय पुन्हा एकदा राज्यसभेत एन्ट्री केली. राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी नुकतीच शपथ घेतली. त्यानंतर पवार हे अॅक्टीव्ह मोडवर असल्याचं दिसून येत आहे. त्यांनी आधी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी बारामती पोटनिवडणुकीबाबत स्पष्ट भूमीका मांडली. काँग्रेसला ही काही सल्ले दिले. आता त्यांनी पक्ष बांधणीवर लक्ष देण्याचे ठरवले आहे. त्याची सुरूवात ते अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातून करणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची चर्चा फिसकटली आहे. शिवाय शरद पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ ही घेतली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पवार ॲक्शन मोडवर आलेले पाहायला मिळत आहेत. लवकरच शरद पवार पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करणारा आहेत. पक्ष संघटना मजबूत आणि बळकट करण्यासाठी पवार पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फिरणार आहेत. ग्रामीण भागात फिरताना पवार कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन स्थानिक परिस्थितीचाही आढावा घेतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली. देवदत्त निकम यांनी आज पुणे येथे शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.
या भेटीत पक्ष मजबुतीकरण व पुणे जिल्ह्याच्या दौऱ्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती निकम यांनी दिली आहे. शरद पवारांची प्रकृती स्थिर आहे असं ही ते म्हणाले. त्यामुळे ते पुन्हा एकदा जोमाने काम करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या स्थितीबाबत ही पवारांसोबत चर्चा झाल्याचं ते म्हणाले. विलिनीकरणाचा मुद्दा आता मागे पडला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यापासून पक्षाच्या बांधणीचे काम केले जाणार आहे. चार पाच तालुक्यांची एकत्रीत बैठक होईल असं ही त्यांनी सांगितलं. पुढच्या दहा ते पंधरा दिवसात हा दौरा होईल असं ही निकम यांनी स्पष्ट केलं. पवारांच्या या दौऱ्यामुळे पक्षाला नक्कीच बळ मिळेल असं ही ते म्हणाले. कार्यकर्त्यांशी ते वन टू वन चर्चा करणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं.
पुणे जिल्ह्यावर सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली पकड आहे. कधी काळी हा जिल्हा शरद पवारांच्या मागे खंबिर पणे उभा राहीला होता. मात्र राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर जिल्ह्यातील स्थिती बदलली आहे. अशा स्थितीत आपला गड राहीलेला हा जिल्हा पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी स्वत: शरद पवारांनी कंबर कसल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग या जिल्ह्यात आहे. त्यामुळे पवारांची जादू पुन्हा एकदा हा जिल्हा आपल्याकडे खेचण्यात यशस्वी ठरते का ते त्यांच्या दौऱ्यात स्पष्ट होणार आहे.