![Railway Budget: अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वेसाठी काय मिळालं? मोठे प्रकल्प मार्गी लागणार का? Railway Budget: अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वेसाठी काय मिळालं? मोठे प्रकल्प मार्गी लागणार का?](https://c.ndtvimg.com/2025-02/oj5t2q_indian-railway-_625x300_03_February_25.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेसाठी काय मिळाले याची चर्चा सुरु आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी 23 हजार 778 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. ही तरदूत 20 पटीने अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यापूर्वी 2009-14 या काळात महाराष्ट्राला रेल्वेसाठी वर्षाला सरासरी 1 हजार 181 कोटी रुपये मिळत होते. यंदा एकाच वर्षातील तरतूद ही तब्बल 20 पटींनी अधिक आहे. 2014 ते 2025 या दरम्यान राज्यात दरवर्षी सरासरी 191 किलोमीटर्सचे नवे रेल्वे मार्ग विकसित केले गेले आहेत. हे प्रमाण यापुर्वीच केवळ दरवर्षी सरासरी 58 किलोमीटर इतके होते. 2009-14 या कालावधीत एकाही मार्गाचे विद्युतीकरण झाले नव्हते. त्यानंतर 2014 ते 2025 या काळात दरवर्षी सरासरी 326 किलोमीटर्स मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले. यामुळे महाराष्ट्रातील 3 हजार 586 म्हणजेच पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे.याच कालावधीत महाराष्ट्रात 2 हजार 105 किलो मीटर्सचे नवे रेल्वे मार्ग बांधण्यात आले. तुलनाच करायची झाल्यास ही लांबी मलेशियातील आता अस्तित्वात असलेल्या संपूर्ण रेल्वे मार्गाच्या लांबी इतकी होते.
महाराष्ट्रात सध्या 1 लाख 58 हजार 866 कोटी रूपयांचे 47 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यातून 6 हजार 985 किलोमीटर मार्गाची बांधणी सुरू आहे. यामध्ये बुलेट ट्रेनसह केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या 'डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर- डिएफसी' सह चार महत्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. राज्यात 5 हजार 587 कोटी रुपयांच्या तरतुदीतून 132 अमृत रेल्वेस्थानकांची निर्मिती केली जात आहे.
रेल्वेची कवच सुरक्षा प्रणाली 4 हजार 339 मार्ग अंतरासाठी कार्यान्वीत केली जाणार आहे. यातील सध्या 576 किमीसाठीची यंत्रणा कार्यान्वीत आहे. राज्यभरात 2014 पासून आतापर्यंत विविध ठिकाणी 1 हजार 62 रेल्वे उड्डाण मार्ग, भुयारी मार्ग (आरएफओबी,आरयुबी) बांधण्यात आली आहेत. याशिवाय 236 ठिकाणी लिफ्ट, 302 एस्कलेटर्स बसविण्यात आले आहेत. तसेच 566 रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध दिली आहे. याशिवाय राज्यातील 11 जिल्ह्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा 11 वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली
महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या वाटचालीत रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व अशी वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांकरिता सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. माल वाहतूक सुविधा सहज सुलभ आणि मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. या सगळ्यातून महाराष्ट्र हे रेल्वेच्या नकाशावरील सशक्त आणि सदृढ राज्य बनले आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world