- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सोने खरेदी कमी करण्याचे आणि परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले आहे
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घोषणांवर तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी केली आहे
- शरद पवारांच्या मते, अचानक निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होऊ शकतात
Sharad Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशाला सोने खरेदी कमी करण्याचे, परदेश दौरे टाळण्याचे आणि पेट्रोल-डिझेलची बचत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर आता देशातील राजकारण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी या गंभीर विषयावर पंतप्रधानांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी पवारांनी केली आहे.
शरद पवारांचा आक्षेप आणि चिंता
शरद पवार यांच्या मते, पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होऊ शकतो. कोणतीही चर्चा न करता अचानक घेतलेल्या अशा निर्णयामुळे सामान्य जनता, उद्योग जगत आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे, असे पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे.
(नक्की वाचा : PM मोदींचे WFH आणि पेट्रोल वाचवण्याचे आवाहन देशापुढील मोठ्या संकटाची चाहूल आहे का? वाचा सविस्तर)
राशपचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियावर काय पोस्ट केले आहे, वाचा...
शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, "मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा.
देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे."
(नक्की वाचा: पुन्हा तेच दिवस येणार? पेट्रोलचे दर आणि PM मोदींचे आवाहन; भारत 'WFH 2.0' साठी खरंच तयार आहे का?)