- सागर कुलकर्णी, प्रतिनिधी
Rohit Pawar News: राशप आमदार रोहित पवार यांनी 18 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत एक मोठा दावा करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी काही आमदारांनी सह्या केल्या होत्या, पण सर्व आमदारांचा त्याला पाठिंबा नव्हता, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच "अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल 13 बैठका झाल्या होत्या. तसंच या सर्व बैठका जयंत पाटील यांच्या घरी झाल्या होता," असाही दावा रोहित पवारांनी केला आहे. तसेच
जयंत पाटलांच्या घरी नेमकं काय घडलं?
रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, विलीनीकरण आणि भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत जयंत पाटील यांच्या निवासस्थानी अजित दादांच्या एकूण 13 बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये राष्ट्रवादी विलीनीकरणाबबात महत्त्वाची चर्चा झाली होती. पण या बैठकांचा तपशील इतके दिवस गुलदस्त्यात का राहिला? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मंगळवारी (17 फेब्रुवारी) पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की,"विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी संपलाय. दादांबरोबर आमची चर्चा झाली होती. आम्ही एनडीएमध्ये जायचे की दादा आमच्याबरोबर येऊन रस्त्यावरच लढाई लढणार होते? या सर्व गोष्टी आमच्याशी बोलल्या जात होत्या. आमच्याकडून पूर्णविराम लागला आहे. दादा जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे. लोढांचे घर समोर आहे. सीसीटीव्ही काढा आणि बघा किती वेळा दादा भेटले".
सुनेत्रा पवारांच्या नावावरून आमदारांमध्ये नाराजी?
धक्कादायक बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्याच्या प्रस्तावाबाबतही रोहित पवार यांनी धक्कादायक माहिती समोर आणलीय. "काही ठराविक आमदारांनी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड करावी यासाठी सही केल्या, सगळे आमदारांनी पाठिंबा का दिला नाही?" असा थेट सवाल रोहित पवारांनी केलाय. पण याद्वारे त्यांचा रोख कोणाकडे आहे? हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
रोहित पवारांच्या या विधानामुळे अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. जर सर्व आमदारांचा पाठिंबा नव्हता, तर ते आमदार नेमके कोण आहेत? आणि त्यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाला विरोध का केला? यावरून चर्चा रंगलीय. या अंतर्गत वादामुळेच विलीनीकरणाची प्रक्रिया रखडली होती का? असाही संशय व्यक्त केला जात आहे.