Pakistan Stock Market : पाकिस्तानी शेअर बाजारात 'आपटी'बॉम्ब, पडझडीमुळे ट्रेडिंग थांबवण्याची पाळी

Pakistan Stock Market Crash - पहलगाम इथे झालेल्या दहशतावादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने Operation Sindoor राबवलं होतं. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप आला आहे. गेल्या काही दिवसात रोज घसरत असलेल्या पाकिस्तानी शेअर बाजाराच्या निर्देशांकांत गुरुवारी इतकी घसरण झाली की ,अखेर ट्रेडींग थांबवावे लागले. यात गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये हवाई हल्ले केले (India's Strike On Pakistan). पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे भारताने सप्रमाण सांगितले होते. दहशतवादाची फॅक्टरी बंद करण्यात पाकिस्तानला कोणताही रस दिसत नसून भारतामध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्यात पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत आहे. यामुळे भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला होता.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारताने 9 ठिकाणी हवाई हल्ले केले. भारताने केलेल्या कारवाईनंतर (Operation Sindoor)   पाकिस्तानी शेअर बाजारात आपटी बॉम्ब फुटला ( Pakistan Stock Market Crash ). शेअर बाजारात इतकी घसरण झाली की अखेर ट्रेडींग थांबवावे लागले. गुरुवारी शेअर बाजाराचे कामकाज सुरू होताच प्रमुख निर्देशांकात म्हणजेच KSE-100 मध्ये  7000 अंकांची घसरण पाहायला मिळाली. 

Advertisement

नक्की वाचा : पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस आणणारी याल्दा हकीम कोण आहे ?

22 एप्रिलपासून घसरणीला सुरूवात 

बुधवारी भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे वृत्तामुळे पाकिस्तानी शेअर बाजार घसरला होता. गुरुवारीही घसरणीचे सत्र सुरूच राहिले. गुरुवारी शेअर बाजारात जवळपास 6 टक्के घसरण झालेली पाहायला मिळाली. ज्यामुळे अखेर ट्रेडींग बंद करावे लागले. 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाम इथे दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचे बळी गेले होते. या घटनेपासूनच पाकिस्तानी शेअर बाजारात घसरणीला सुरुवात झाली होती. जवळपास 15 दिवसांत पाकिस्तानी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक केएसई-100 इंडेक्स 15000 अंकांनी गडगडला आहे. 22 एप्रिल रोजी KSE 100 निर्देशांक 1,18,430 अंकांवर होता, तो आता 1,03,060 पर्यंत खाली घसरला आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा : Bomb Blast in Lahore : साखळी बॉम्बस्फोटांनी पाकिस्तान हादरला, लाहोर विमानतळाजवळ 30- 40 मिनिटे स्फोट

पाकिस्तानची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट असून तिथे महागाई प्रचंड वाढलेली आहे. तिथल्या जनतेमध्ये वाढत्या महागाईमुळे असंतोष आहे. असं असतानाही पाकिस्तानने दहशतवादाला पोसणे सुरूच ठेवले आहे. अखेर भारताला पाकिस्तानमध्ये पोसले जात असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर प्रहार करावा लागला. यामुळे पाकिस्तानी शेअर बाजारात घबराटीचे वातावरण असून, घसरणीमुळे पाकिस्तानी गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. 

नक्की वाचा : Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही", केंद्रीय मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

पाकिस्तान कर्जबाजारी झाला असून , आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे आपल्याला अधिकचे कर्ज मिळावे यासाठी पाकिस्तानी नेतेमंडळी आटापिटा करत आहेत. पाकिस्तानकडे 15 अब्ज डॉलर्सची परकीय गंगाजळी असून पाकिस्तान कंगाल होण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आधीच सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली आहे. यामुळे येत्या काळात पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.  भारताने पाकिस्तानला जाणारे पाणी अडवल्याने पाकिस्तानातील उद्योगांना पाण्याच्या कमतरमतेचा सामना करावा लागू शकतो.