जागतिक स्तरावर युद्धाचा तणाव वाढत असतानाच इराणकडून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी घोषणा केली आहे की, जोपर्यंत लेबनॉन-इस्रायल युद्धविराम प्रभावी आहे, तोपर्यंत 'स्ट्रेट ऑफ होर्मूज' (Strait of Hormuz) पूर्णपणे खुला राहील. या घोषणेमुळे जागतिक तेल पुरवठा साखळीवर आलेले संकट तूर्तास टळले असून, भारतासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
काय आहे 'स्ट्रेट ऑफ होर्मूज'चे महत्त्व?
स्ट्रेट ऑफ होर्मूज हे पर्शियन खाडी आणि ओमानच्या खाडीला जोडणारे एक अरुंद सामुद्रधुनी आहे. या मार्गाची रुंदी केवळ 21 ते 33 किलोमीटर आहे. जगातील एकूण तेल वाहतुकीचा मोठा हिस्सा याच मार्गावरून जातो. अरुंद मार्ग असल्याने युद्धाच्या काळात येथे जहाजांना सर्वाधिक धोका असतो.
(नक्की वाचा- Dombivli News: डोंबिवलीकरांना उन्हात महावितरणचा 'शॉक'; ग्राहकांना 100 ते 5000 रुपये भरण्याच्या नोटीसा)
होर्मूज ते भारत प्रवासाचे अंतर
होर्मूज स्ट्रेटमधून निघालेली जहाजे प्रामुख्याने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कांडला आणि मुंबई बंदरात येतात. कांडला (गुजरात): होर्मूज ते कांडला हे अंतर साधारण 1000 ते 1550 किमी असून, जहाजांना येथे पोहोचण्यासाठी सुमारे 37 तास लागतात. तर मुंबई बंदरात पोहोचण्यासाठी जहाजांना सुमारे 53 तास लागतात. तेलवाहू जहाजे साधारण 24 ते 31 किमी प्रति तास वेगाने प्रवास करतात. संपूर्ण प्रवासाला साधारण 2 ते 3 दिवस लागतात.
(नक्की वाचा- Nagpur School Holiday: नागपुरात शनिवारी सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर; कुणा-कुणाला सुट्टी लागू?)
भारताची टेन्शन का मिटलं?
भारत आपल्या गरजेच्या 70 ते 80 टक्के कच्चे तेल आयात करतो. ज्यातील मोठा भाग याच मार्गाने येतो. जर इराणने हा मार्ग बंद केला असता, तर भारतात इंधनाचे दर गगनाला भिडले असते आणि महागाईचा भडका उडाला असता. इराणच्या या निर्णयामुळे आता तेल कंपन्यांना आणि सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
हा मार्ग खुला राहिल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहण्यास मदत होणार आहे. रशिया-युक्रेन आणि मध्य पूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणची ही भूमिका आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world