राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप वेगळ्या वाटेवर जाणार का अशी चर्चा आता रंगली आहे. संग्राम जगताप गेले काही दिवस कट्टर हिंदुत्व भूमिका मांडत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार अल्पसंख्यांक समुदायाच्या बाजूने भूमिका घेत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रतिनिधी असणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मागील दोन आठवड्यात अल्पसंख्यांक समुदायाच्या विरोधात आणि कट्टर हिंदुत्वाची भूमिका मांडली आहे. संग्राम यांची कृती अजित पवारांची डोकेदुखी वाढवणार आहे असं म्हटलं जात आहे. वास्तविक संग्राम जगताप हे गेले काही दिवस वेगवेगळ्या कारणावरून नाराज असल्याची चर्चा आहे.
(नक्की वाचा- BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ! 'हे' कारण ठरणार अडथळा)
अशातच जगताप यांनी अजित पवार जी भूमिका मांडतात त्याच्या विरोधात भूमिका मांडली आहे. यामुळे जगताप राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन पुढील काळात हिंदुत्व असणारे राजकीय पक्ष स्वीकारणार का याची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार यांनी मुंबईत मंगळवारी नेहमीप्रमाणे सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला जगताप गैरहजर राहिले.
अजित पवारांनी संग्राम जगताप यांच्या कृतीबाबत बैठकीत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकीकडे धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून आपण पुढे जात असताना एखाद्या धर्माबाबत वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह विधान पक्षातील आमदाराने करणे पक्षाला परवडणारे नाही. संग्राम जगताप यांच्या सारखी कृती खपवून घेणार नसल्याची भूमिका अजित पवारांनी मांडल्याची माहिती समोर येत आहे. आपण स्वत संग्राम जगताप यांच्याशी बोलणार असून अशा प्रकारची वादग्रस्त का करत असल्याचा जाब विचारणार असल्याची माहिती अजित पवारांनी आमदारांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
(नक्की वाचा- Mahayuti News: महायुती आगामी निवडणुका एकत्र लढणार? समन्वय समितीच्या बैठकीत काय घडलं?)
राष्ट्रवादीतील माजी आमदार नाराज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदार नाराज असल्याटची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे हे आमदार पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षातील कोणत्याच बैठकीत आपल्याला बोलवत नाही आणि कोणतीच जबाबदारी पक्षातून दिली जात नाही, अशी खंत माजी आमदारांकडून व्यक्त होते. पक्षात नवीन येणाऱ्या माजी आमदारांचा मान-सन्मान केला जातो. पण पक्षाच्या अडीअडचणीच्या काळात पक्षाच्या सोबत असलेल्या माजी आमदारांना अशी वागणूक का?असा सवाल या माजी आमदारांचा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.