
मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ सतीश कुमार यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान केलेल्या घोषणेनुसार, मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रणालीसाठी 238 नवीन एसी लोकल ट्रेन खरेदी करण्यातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. लवकरच या ट्रेनसाठी निविदा काढल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
सतीश कुमार यांनी एसी लोकल ट्रेनसोबतच इतरही काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. डिसेंबर 2025 पर्यंत दोन नॉन-एसी लोकल ट्रेनचे प्रोटोटाइप तयार होतील, ज्यांमध्ये स्वयंचलित दरवाजा बंद करण्याची यंत्रणा असेल. गेल्या काही काळात लोकल ट्रेनमधून पडून होणाऱ्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. 'मिड डे'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केले आहे.
या नवीन एसी लोकल ट्रेनमुळे मुंबईतील लोकल प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि जलद होईल अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांना सर्व स्थानकांवर 15-डब्यांच्या ट्रेन चालवण्यासाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून प्रवाशांची क्षमता वाढवता येईल.
(नक्की वाचा- Pune News : पुण्यात धावणार डबल डेकर बस; सुरुवातीच्या टप्प्यात कसा असेल मार्ग?)
15 डब्यांच्या ट्रेनसाठी तयारी
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आल्याचे सतीश कुमार यांनी सांगितले. मुंबईतील वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन त्यांनी अनेक मोठे बदल प्रस्तावित केले आहेत. प्रवाशांची क्षमता वाढवण्यासाठी मुंबईतील सर्व 12-डब्यांच्या ट्रेनचे रूपांतर 15-डब्यांच्या ट्रेनमध्ये करण्याची तयारी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
चांगल्या टर्मिनलसाठी प्लानिंग
मुंबईला अधिक चांगल्या टर्मिनलची गरज असल्याचे मान्य करत, पनवेल, दादर, वांद्रे टर्मिनस, जोगेश्वरी आणि वसई यांसारख्या स्थानकांचा विकास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रेल्वे स्टेशनचे मेट्रोसोबत योग्य एकत्रीकरण करण्यासाठी सर्व रेल्वे स्थानकांचे सर्वेक्षण केले जात आहे. घाटकोपरसारख्या महत्त्वाच्या केंद्रावर काम सुरू आहे.
(नक्की वाचा- VIDEO: 'थार'चा थरार! गाडीला बांधून ATM फोडण्याचा प्रयत्न, चोरट्यांचा प्रताप CCTVत कैद)
सतीश कुमार यांनी पुढे सांगितलं की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या कामात सुधारणा आणि गती आणण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या कामात अनेक आव्हाने येतात, कारण नेहमी वाहतूक सुरू असतानाच बांधकाम करावे लागते. तरीही, सर्व आव्हानांवर मात करून प्रगती साधली जात असल्याचे ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world