Ashadhi Wari 2026: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर आणि श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यासारखी महत्त्वाची देवस्थाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी रस्ते जाळे मजबूत असणे अतिशय गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन बांधण्यात आलेले महामार्ग प्रकल्प जिल्ह्यातील आध्यात्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना सुलभ ठरले आहेत. विशेषतः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पालखी घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांसाठी स्वतंत्र रस्ता तयार करण्यात आला आहे. यामुळे वारकरी भाविकांची वाट अधिक सुखकर झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गुरुवारी (14 मे) केली. या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला.
आईची इच्छा आणि पांडुरंगाचा आशीर्वाद
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी भावुक झाले. मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, "तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट हे रस्ते यापूर्वी मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. त्यामुळे वारकरी भाविकांना वाहतुकीच्या समस्येमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या मार्गावरील रस्ते करण्याची संधी मिळाली तर ते रस्ते चांगले कर अशी इच्छा माझ्या आईनी व्यक्त केली होती. पांडुरंगाच्या आणि आईच्या आशीर्वादाने मला रस्ते करण्याची संधी मिळाली. सध्या पालखी महामार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करण्यात येतील. पालखी महामार्गावरील काही ठिकाणची रखडलेली कामे डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येतील. तसेच वाखरी ते पंढरपूर रस्त्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून काही परवानगी आलेल्या नाहीत त्याबाबत तत्काळ पाठपुरावा करून काम मार्गी लावण्यात येईल "
(नक्की वाचा : Ashadhi Wari 2026: ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा 33 दिवसांचा प्रवास; यंदा माऊलींचे रिंगण कुठे-कधी होणार? वाचा)
📍संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 14, 2026
🛣️ पालखी मार्ग निरिक्षण
लाखो वारकऱ्यांची ‘वारी' सुखकर व आल्हाददायक व्हावी, या उद्देशाने पुनर्विकास करण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-९६५) कामाचे आज निरिक्षण केले.
भारत भूमीच्या सनातन परंपरेत… pic.twitter.com/XcgIx89s86
पुरातन विहिरींचे जतन आणि संवर्धन
या दौऱ्यात केंद्रीय मंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) केलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या कामाचे विशेष कौतुक केले. माळशिरस तालुक्यातील घुले वस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली पुरातन विहीर महामार्गाच्या कामात येत होती. पण तिचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गाच्या रचनेत विशेष बदल केला आणि ही विहीर सुरक्षित ठेवली.
याच धर्तीवर पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील ऐतिहासिक बाजीराव विहिरीचेही प्राधिकरणाकडून जतन आणि संवर्धन करण्यात आले आहे. या दोन्ही पुरातन विहिरींची पाहणी नितीन गडकरी यांनी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world