आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. बीएमसी निवडणुकीआधी ठाकरे बंधू बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत एकत्र आले होते. ठाकरे बंधुंसाठी ही लिटमस टेस्ट होती. मात्र या टेस्टमध्ये ठाकरे बंधू फेल झाल्याचं दिसून आलं आहे. कारण बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधुंना भोपळा देखील फोडता आलेला नाही
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत एकूण 21 जागांसाठी मतदान झाले होते, ज्यापैकी एकाही जागेवर ठाकरे बंधूंच्या पॅनेलला विजय मिळवता आला नाही.
(नक्की वाचा- Mumbai Rain News: मुंबई, ठाण्यातील पावसाच्या परिस्थितीचा एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा, म्हणाले हे तर...)
बेस्ट पतपेढीवर गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंच्या कामगार सेनेची सत्ता होती. त्यामुळे या निवडणुकीतून आपली ताकद दाखवण्याची ही एक उत्तम संधी त्यांना होती. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येत 'उत्कर्ष पॅनेल'ची स्थापना केली होती. त्यामुळे या निवडणुकीची मोठी चर्चा होती. मात्र, आता या पराभवामुळे मनसे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
बेस्ट पतपेढी निवडणुकीत प्रसाद लाड यांच्या श्रमिक पॅनेलचे 7 उमेदवार विजयी झाले तर शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकल्या. भाजप नेते प्रसाद लाड यांनी निकालानंतर ट्वीट करून आपला आनंद व्यक्त केला. "ब्रॅण्डचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत, जागा दाखवली" अशा शब्दात त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊनही त्यांना विजय मिळवता न आल्याने त्यांच्या राजकीय भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.