Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्यासोबत झालेल्या एका संवादाची आठवण शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी सांगितलं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र याव्यात आणि पुन्हा एकदा 'पवार कुटुंब' एक व्हावे, यासाठी अजित पवार गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होते, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात चर्चा करताना अजित पवार भावुक झाले होते, अशी माहिती काकडे यांनी दिली.
शरद पवारांना राजी करण्याची दिली होती जबाबदारी
अंकुश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांनी म्हटलं होतं की, श्रीनिवास पाटील, विठ्ठल मणियार आणि तुमचे साहेबांसोबत चांगले संबंध आहे. तुमच्या भेटीगाठीही होत असतात. तुम्ही तिघांनी साहेबांशी (शरद पवार) बोलावे आणि त्यांना विलीनीकरणासाठी राजी करावे, असे दादांनी दोनवेळा कळवले होते.
(नक्की वाचा- Ajit Pawar: अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार? कुटुंबातील 3 आणि कुटुंबाबाहेरील 3 नावे चर्चेत)
"कुठे माशी शिंकली काय माहिती?"
मागील वर्षभरापासून राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरु होत्या. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस 12 डिसेंबरलाच एकत्र येणार होत्या. मात्र कुठे माशी शिंकली काय माहित? पण आपण लवकरच एकत्र येणार आहोत, असं देखील अजित पवारांनी म्हटलं होतं, असा दावा अंकुश काकडे यांनी केला.
अंकुश काकडे यांनी या संदर्भात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना पत्र पाठवून अजित पवारांच्या इच्छेबाबत सविस्तर कळवले होते.
(नक्की वाचा- VIDEO: "दादाला 'I Love You' सांग...", अजित पवारांच्या चाहत्याची पार्थ पवारांना भावनिक साद)
काय होता अजित पवारांचा प्लॅन?
महापालिका निवडणूक दोन्ही गटांनी एकत्रित लढून आपली ताकद सिद्ध करावी. निवडणुकांनंतर दोन्ही पक्षांचे पूर्णतः विलीनीकरण करून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करावे. कुटुंबातील दुरावा मिटवून पुन्हा एकदा एकसंध राष्ट्रवादी उभी करावी, अशा अजित पवारांचा प्लॅन होता का? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world