
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ पुन्हा घेतला जाणार का याबाबत संभ्रम आहे. शासनाने याबाबत आता स्पष्टीकरण दिलं आहे. लाडकी बहीण लाभार्थ्यांकडून निधी सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत, असं स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
लाडकी बहीण योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळवण्यात येत आहे, अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही. लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास सचिव यांनी दिले आहे.
(नक्की वाचा- Kolhapur News: पुरेपूर कोल्हापूर! रिक्षांची सौदर्य स्पर्धा, एका पेक्षा एक रिक्षांनी वेधलं सर्वांचं लक्ष)
अदिती तटकरे यांनी काय म्हटलं होतं?
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखीय याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. "वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून गैरसमज पसरवले जात आहेत की लाडकी बहीण योजनेत बदल होणार आहे. मात्र एकाही लाडक्या बहिणीचे लाभ किंवा पैसे आम्ही परत घेतलेले नाहीत. तसेच आमच्याकडे वेगवेगळ्या ठिकाणाहून पत्र येतं आहेत की जे पात्र नाहीत त्यांचा लाभ बंद करायचा. 5-10 हजार अर्ज दररोज येत आहेत. काही महिन्यात महिला अविवाहित होत्या आणि लाभ घेत होत्या पण त्या आता इतर राज्यात गेल्या आहेत त्या योजना बंद करण्यासाठी अर्ज करत आहेत", असं आदिती तटकरे यांनी म्हटलं होतं.
(नक्की वाचा- AJit pawar: '...तर मी त्यांची अशी गंमत करीन की त्यांच्या,' अजित पवारांनी कुणाला सुनावलं)
या महिलांना लाभ मिळणार नाही
ज्या महिलांच्या कुटुंबात इन्कम टॅक्स भरला जात आहे अशा महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलाकडे चारचाकी वाहन आहे त्यांना अपात्र करण्यात येणार आहे. इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त फरकाची रक्कम मिळेल. ज्या महिलांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव वेगवेगळे आहे अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे. ज्या महिला लग्न करून परराज्यात स्थायिक झाल्या आहेत अशा महिलांनाही आता लाडक्या बहीणीचा लाभ घेता येणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world