जाहिरात

Eknath Shinde: 59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर! एकनाथ शिंदेंचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन काय?

विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा कमी पडू नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे शिंदे म्हणाले.

Eknath Shinde: 59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर! एकनाथ शिंदेंचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन काय?
  • 9500 विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या जागतिक संस्थेला भेट देण्याची संधी
  • ‘मिशन भरारी’ उपक्रमांतर्गत इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांद्वारे निवड करण्यात आली आहे
  • सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता विज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करणे आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
ठाणे:

जवळपास 9500 विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देण्याची संधी मिळत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी' या उपक्रमातून ‘ग्रामीण ते अवकाश' हा व्हिजन प्रत्यक्षात उतरतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. या शैक्षणिक सहलीला 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

‘मिशन भरारी' उपक्रमाचे उद्घाटन 26 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले होते. इयत्ता 5 वी ते 8 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धा परीक्षांद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 9316 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यातून 2007 विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर निवड झाली आणि अंतिम टप्प्यात 478 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर परीक्षा घेण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेतून प्रत्येक तालुक्यातील सरासरी 10 विद्यार्थ्यांची निवड करून एकूण 59 विद्यार्थ्यांना या विशेष सहलीसाठी पात्र ठरवण्यात आले असून, यामध्ये 54 मराठी माध्यम आणि 5 उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

नक्की वाचा - Success Story: ना कश्मीर ना हिमाचल! महाराष्ट्रातल्या 'या' गावात सफरचंदाची शेती, शेतकरी मालामाल

ही सहल केवळ पर्यटन नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेला उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे तसेच विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे शिंदे म्हणाले. विद्यार्थ्यांना संशोधन, अवकाश विज्ञान, प्रयोगशाळा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले. सहल कार्यक्रमानुसार 27 एप्रिल रोजी मुंबईहून तिरुवनंतपुरम येथे प्रवास होईल. 28 एप्रिल रोजी विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर पुतळा आणि सनसेट व्ह्यू पॉईंटला भेट दिली जाईल. 29 एप्रिल रोजी विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशन (TERLS) आणि प्रियदर्शिनी तारांगण येथे भेट दिली जाईल. 30 एप्रिल रोजी नैसर्गिक इतिहास संग्रहालये, तर 1 मे रोजी नेपियर संग्रहालय येथे भेट देऊन परतीचा प्रवास केला जाईल. 

नक्की वाचा - Pratap Sarnaik: मराठी सक्तीबाबत काय निर्णय झाला? रिक्षा- टॅक्सी चालकांचं टेन्शन वाढलं की कमी झालं?

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. राहण्याची व्यवस्था फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली असून, प्रवासासाठी वातानुकूलित बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहलीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना ब्लेझर, टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट, कॅप, स्पोर्ट्स शूज, सॉक्स, ओळखपत्र आणि ट्रॉली बॅग आदी साहित्य देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.या उपक्रमासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा कमी पडू नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे शिंदे म्हणाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com