अमजद खान, कल्याण
Kalyan News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या पावसाळ्यात अधिकच गंभीर झाली आहे. यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था अपघातांना आमंत्रण देत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी प्रशासनाला खड्डेमुक्त रस्ता दाखवण्याचे थेट आव्हान दिले आहे.
काही दिवसांपूर्वी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी स्वतः रस्त्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने खड्डे भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अनेक रस्त्यांवरील खड्डे भरले गेलेले नाहीत. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात मोठी नाराजी व्यक्त होत आहे.
(नक्की वाचा- Dadar Kabutar Khana: शस्त्र उचलण्याची भाषा कराल तर याद राखा! गोवर्धन देशमुखांचा जैन मुनींना थेट इशारा)
भाजप पदाधिकारी संतोष होळकर यांनी यावर नाराजी व्यक्त करत एक अनोखी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "केडीएमसी हद्दीत सलग 500 मीटर लांबीचा एकही खड्डा नसलेला रस्ता जो कोणी दाखवेल, त्या नागरिकाला किंवा अधिकाऱ्याला स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी दहा हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल."
संतोष होळकर यांच्या मते, "आयुक्तांनी पाहणी करून सूचना दिल्यानंतरही प्रत्यक्षात खड्डे भरण्याचे काम अपेक्षित गतीने झालेले नाही. खड्डेमुक्ती हा केवळ कागदोपत्री दावा न राहता वास्तवात दिसला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे." प्रशासनाने नागरिकांचा होणारा त्रास आणि अपघातांची भीती लक्षात घेऊन तातडीने पावले उचलली पाहिजेत, अशी मागणीही होळकर यांनी केली आहे.
(नक्की वाचा- Mumbai News : एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे एकाचा व्यासपीठावर येणार; काय आहे निमित्त?)
होळकर यांच्या या आव्हानामुळे केडीएमसी प्रशासनावर दबाव वाढला असून, आता 15 ऑगस्ट रोजी खड्डेमुक्त रस्त्याचा शोध घेण्यासाठी नागरिकही सक्रिय होण्याची शक्यता आहे.