Pune News : पुण्यातील केतन अग्रवाल या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक वळण मिळाले आहे. सुरुवातीला लोहगड किल्ल्यावरील ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एक क्रूर आणि पूर्वनियोजित खून होता, हे आता स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार दुसरी कोणी नसून केतनची होणारी पत्नीच निघाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात मृत तरुणाच्या वडिलांनी समोर येत थेट होणाऱ्या सुनेवर आणि तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले आहेत.
लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी घडलेल्या या भयानक घटनेवर मृत केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी अनेक खुलासे केले आहेत. आपल्या 26 वर्षांच्या मुलाचा इतक्या क्रूर पद्धतीने जीव घेतला जाईल, असा विचारही त्यांनी केला नव्हता, असं त्यांनी सांगितलं. पोलिसांच्या वेगवान तपासामुळे या गुन्ह्याचा छडा लागला असून, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आधी पासपोर्ट चोरीला....
विशाल अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन आणि सिया यांचा साखरपुडा यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात झाला होता. लग्नाआधी ते दोघे फिरायला जाणार होते. त्यानुसार 6 तारीखला ते बालीला रवाना होणार होते. त्यांच्यासोबत एकूण 4 जण बालीला एकत्र प्रवास करणार होते. पण अगदी प्रवासाच्या दिवशी एक मोठी गडबड झाली.
या 4 जणांपैकी फक्त आणि फक्त केतनचाच पासपोर्ट अचानक चोरीला गेला. यामुळे केतनला बालीला जाता आले नाही आणि त्याला थेट विमानतळावरूनच निराश होऊन घरी परतावे लागले होते. हा देखील त्याच कटकारस्थानाचा एक भाग असावा, असा संशय आता व्यक्त होत आहे.
( नक्की वाचा : Triple Murder: आधी आईला संपवून रक्ताचे डाग धुतले, मग बहीण-वडिलांची वाट पाहिली; पोटच्या मुलीचे धक्कादायक कृत्य )
लोहगडावर काय झालं?
यानंतर सियाने तिच्या वाढदिवसाचे निमित्त साधून केतनला लोहगड किल्ल्यावर येण्यास सांगितले. तिच्या सांगण्यावरून केतन तिथे गेला. त्याच वेळी तिचा प्रियकर चेतन चौधरी हा दुचाकीवरून लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता. तो या दोघांचा पाठलाग करत होता. किल्ल्यावर गेल्यानंतर सिया केतनला एका अत्यंत धोकादायक कठड्यावर घेऊन गेली. तिथे सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनला आधी एका वस्तूने जोरात मारले आणि त्यानंतर तिथून थेट 500 फूट खोल दरीत ढकलून दिले. या भीषण घटनेत केतनचा जागीच मृत्यू झाला.
लग्न करायचे नव्हते तर...
आपला तरुण मुलगा गमावलेल्या विशाल अग्रवाल यांनी अत्यंत भावनिक होत सियाच्या क्रूर मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, जर तिला हे लग्न करायचे नव्हते, तर तिने आम्हाला साधे नकार द्यायला हवा होता. तिने लग्नाला नकार दिला असता तर आम्ही लगेच हे लग्न रद्द केले असते. पण एखाद्याचा 26 वर्षांचा मुलगा संपवून टाकण्याचा इतका टोकाचा आणि क्रूर निर्णय या दोघांनी का घेतला? त्यांची मानसिकता किती भयंकर आणि निर्दयी आहे, याचा समाजाने विचार करण्याची गरज आहे. अशा प्रकारची क्रूर विचारसरणी आणि संस्कार त्यांच्या कुटुंबातून किंवा संगोपनातून येतात का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
( नक्की वाचा : School Teacher: शिक्षिकेचे विद्यार्थ्याशी संबंध, VIDEO हाती लागताच मुलांनी ब्लॅकमेल करून मागितली एकच गोष्ट )
अनैतिक संबंधांतून संपूर्ण प्लॅनिंग
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन हा एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा होता, तर सिया ही एका मोठ्या मसाले विक्रेत्याची मुलगी आहे. सियाच्या दुकानाच्या शेजारीच चेतनचे दुकान होते आणि तिथूनच त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले होते. सियाचे लग्न ठरल्याने दोघेही अस्वस्थ होते आणि त्यांनी केतनचा काटा काढण्याचे ठरवले. या प्रकरणात पोलिसांनी चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोघांनाही अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे या गुन्ह्याचा छडा अतिशय वेगाने लागला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world