Advanced Ambulance: महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अधिक वेगवान आणि सक्षम करण्याच्या अनुषंगाने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या नवीन रुग्णवाहिका दाखल होणार आहेत. 108 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करताच या रुग्णवाहिका रुग्णांच्या दारात हजर होतील, ज्यामुळे गरजूंना तातडीने उपचार मिळणे अधिक सोपे होणार आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहर असो वा दुर्गम गाव, प्रत्येक ठिकाणी गरजूंना रुग्णवाहिकेची सेवा वेळेत मिळावी असा सरकारचा प्रयत्न आहे. या रुग्णवाहिका केवळ वाहन नसून ते एक 'फिरते रुग्णालय' असेल.
यामध्ये ऑक्सिजन यंत्रणा, प्रथमोपचाराची आधुनिक साधने आणि रुग्णांना ने-आण करण्यासाठी आरामदायी व्यवस्था असेल. रुग्णवाहिकांचे आतील रचना ही विशिष्ट पद्धतीने बनविण्यात आली आहे. यामुळे रुग्णवाहिकेतील स्वच्छता राखणे सोपे जाईल आणि संसर्ग पसरणार नाही.
(नक्की वाचा- Iran-US War Update: जगाचं टेन्शन वाढलं! इराण-US युद्ध पुन्हा भडकणार? युद्धविरामानंतर 24 तासात काय काय घडलं?)
1756 रुग्णवाहिकांचे मोठे नेटवर्क
या प्रकल्पासाठी 'सुमित एसएसजी' आणि 'पिनाकल इंडस्ट्रीज' ने हातमिळवणी केली आहे. या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रासाठी 1756 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अत्यवस्थ रुग्णांसाठी 'अॅडव्हान्स्ड' सुविधा, साध्या उपचारांसाठी 'बेसिक' सुविधा आणि लहान नवजात बाळांसाठी विशेष रुग्णवाहिका अशा विविध प्रकारच्या रुग्णवाहिकांचा यात समावेश असणार आहे.
लोकांचा जीव वाचवणे हेच आमचे लक्ष्य'
"वेळेत उपचार मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. लोकांचा जीव वाचवणे हा मुख्य उद्देश असून त्यासाठी रुग्णवाहिकांचा ताफा अधिक मजबूत आणि सुरक्षित करण्यावर भर आहे", असं सुमित एसएसजीचे अध्यक्ष सुमित साळुंके यांनी सांगितले. तर या उपक्रमामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल असा विश्वास पिनाकल इंडस्ट्रीजचे सचिन देशमुख यांनी व्यक्त केलाय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world