Aditi Tatkare: बलात्कार आणि लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींना पॅरोलवर सोडण्यात येऊ नये, अशी कडक तरतूद प्रचलित कायद्यात करण्याची मागणी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे मंत्रिमंडळ बैठकीत निवेदनाद्वारे मागणी केली.
गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल मिळणार नाही?
या मागणीची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पावले उचलली आहेत. त्यांनी विधी आणि न्याय विभागाच्या सचिवांना या विषयावर आवश्यक कायदेशीर तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे भविष्यात अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल मिळणे अधिक कठीण किंवा अशक्य होण्याची शक्यता आहे.
बलात्कार व लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेले गुन्हेगार पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच स्वरूपाचे गुन्हे करत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. अशा गंभीर व अमानवी स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये दोषी असलेल्या नराधमांना कोणत्याही परिस्थितीत… pic.twitter.com/hBkzctbBGS
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) May 5, 2026
आदिती तटकरे यांची मोठी मागणी
मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेले आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून या पार्श्वभूमीवर, अशा गुन्ह्यांतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पॅरोल देण्यात येऊ नये, अशी कायद्यात तरतूद करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून समाजात सकारात्मक संदेश जाऊन व्यवस्थेबाबत विश्वास निर्माण होईल. महिलांच्या सुरक्षेबाबत कडक धोरणात्मक निर्णय घेण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world