अमजद खान, कल्याण
Political News : मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा आता वेगाने होऊ लागल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना एक फोन करावा आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य मनसे ठाकरे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलं आहे. मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही कोणताही पाऊल उचलायला तयार आहोत, असंही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आज संदीप देशपांडे, अमित ठाकरे आणि आता अविनाश जाधव या मनसेच्या बड्या नेत्यांकडून मनसे-शिवसेना युतीबाबत सकारात्मक वक्तव्य आली आहेत. अविनाश जाधव यांनी म्हटलं की, राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीची चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्र हितासमोर आमचे वाद, भांडणे छोटी आहेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. आता तुम्हाला असं वाटत असेल आम्ही पुढची पावलं उचलली पाहिजेत, तर उद्धव साहेबांनी राज साहेबांना फोन करावा आणि प्रस्ताव द्यावा आम्ही तयार आहोत.
मराठी माणासासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कुठलंही पाऊल उचलायला तयार आहोत. आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे, तुम्हीही एक पाऊल पुढे टाकावं. रोज मीडियावर येऊन बोलण्यापेक्षा प्रस्ताव द्यावा. अमित ठाकरेंनी सोपा पर्याय दिला आहे. उद्धव साहेबांनी राज साहेबांना एक फोन करावा. मी खात्रीने सांगतो राज साहेब समर्थन करतील, असा दावा अविनाश जाधव यांनी केला आहे.
(नक्की वाचा- Maharashtra Politics: 'महायुतीत नाराजीनाट्य, 3 पक्षांचा तमाशा..', ठाकरे गटाची टीका)
तुमच्याकडून पहिला कॉल तर येऊद्या. मीडियावर बोलता, पण प्रस्ताव तर द्या. की फक्त दाखवण्यासाठी मीडियासमोर बोलत आहात. 2014 आणि 2017 चा आमचा अनुभव वाईट आहे. त्यावेळी देखील शेवटच्या क्षणी आम्हाला टाळलं गेलं. तसा अनुभव आम्हाला पुन्हा येऊन नये म्हणून आम्ही पावलं जपून टाकतं आहोत. खरंच इच्छा असेल महाराष्ट्रहितासाठी एकत्र यावं तर उद्धव साहेबांना राज साहेबांना फोन केला पाहिजे, असं आवाहन अविनाश जाधव यांनी केलं आहे.
अमित ठाकरे यांनी काय म्हटलं?
अमित ठाकरे यांनी म्हटलं की, "आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्यांची इच्छा असेल तर त्यांनी एकमेकांना फोन करावा. दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत. दोन्ही भावांनी एकत्र यावे की नाही हे त्यांनी ठरवावे. राज ठाकरे यांची इच्छा असेल ती माझी इच्छा असेल. पुढाकार कोणीही घ्यावा. मात्र मी घेऊ शकत नाही."
(नक्की वाचा- मोठी बातमी! ठाकरे गटाचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, पावसाळी अधिवेशनात देणार दणका)
मनसे-शिवसेना युती झाल्यास...
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही पक्षांचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मनसे ठाकरे गट एकत्र आल्यास दोन्ही पक्षांची मराठी मतांची टक्केवारी निर्णायक ठरू शकते. शिवसेना मनसे युती झाल्यास महायुती आणि इतर पक्षांना आव्हान निर्माण होऊ शकते. याशिवाय मनसेृ-ठाकरे गट युतीमुळे महाविकास आघाडीला बळ मिळू शकते.