
पाच दिवस चाललेल्या मराठा आंदोलनानंतर अखेर मुंबई शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आंदोलकांनी मुंबई सोडल्याने मुंबई महानगरपालिकेने देखील परिसर स्वच्छ केला आहे. मात्र पाच दिवसांनंतर हा परिसर स्वच्छ करताना BMC च्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. आझाद मैदान परिसरातून 101 मेट्रिक टन कचरा गोळा करत मोठी स्वच्छता मोहीम राबवली आहे.
मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर, दक्षिण मुंबईचे रस्ते आंदोलकांच्या गर्दीतून मोकळे झाले. दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास, पोलीस आणि आरएएफ दलांनी सीएसएमटी स्टेशन परिसर मोकळा करण्यासाठी पावले उचलली. तर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना जागा खाली करण्याची घोषणा केली.
101 मेट्रिक टन कचरा
आंदोलक निघून गेल्यानंतर, महापालिका आणि रेल्वे प्रशासनासमोर सर्वात मोठे आव्हान कचरा साफ करण्याचे होते. 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत, महापालिकेने आझाद मैदान आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून 101 लाख किलो म्हणजेच 101 मेट्रिक टन कचरा गोळा केला. मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांना जागा खाली करण्याचे आदेश दिल्यानंतर, महापालिकेने मध्यरात्रीच मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान सुरू केले. सोमवारच्या रात्रीच्या शिफ्टमध्ये 400 हून अधिक स्वच्छता कर्मचारी कामाला लागले, तर मंगळवारी सकाळपासून 1,000 कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले.
स्वच्छतेचे काम सोपे करण्यासाठी, महापालिकेने दोन मिनी कॉम्पॅक्टर आणि एक मोठा कॉम्पॅक्टर तसेच पाच लहान कचरा संकलन वाहने वापरली. याव्यतिरिक्त, आंदोलनस्थळी सुमारे 2,000 कचरा पिशव्या वाटण्यात आल्या आणि कचरा कुंड्याही उपलब्ध करून देण्यात आल्या.
मराठा आंदोलकांचाही मदतीचा हात
दरम्यान, मैदान आणि परिसरात स्वच्छता राखण्याकरता सहकार्य करण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलक बांधवांनीसुद्धा कचरा गोळा करणयासाठी सहकार्य केले. महानगरपालिका प्रशासनाकडून आझाद मैदान आणि परिसरात पाणी, वैद्यकीय सुविधा, शौचालये आदी सोयी-सुविधाही पुरवण्यात आल्या होत्या.
सीएसएमटी स्टेशनवर अतिरिक्त प्रवाशांची गर्दी, रेल्वे सेवांवरही परिणाम
या आंदोलनामुळे सीएसएमटी रेल्वे स्टेशन हजारो आंदोलकांसाठी तात्पुरते शिबिर बनले होते. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी स्टेशनवर दररोज सुमारे 1.5 मेट्रिक टन कचरा जमा होत होता, जे सामान्यतः एका आठवड्यात जमा होणाऱ्या कचऱ्याइतके आहे. याव्यतिरिक्त, नियमित 80 सफाई कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त 200 अतिरिक्त कर्मचारी दररोज सेवेत होते. स्टेशनवर दररोजच्या 1 लाख प्रवाशांच्या तुलनेत सरासरी 20,000 अतिरिक्त प्रवासी होते. दुपारी 11 वाजल्यानंतर आंदोलकांची गर्दी कमी होऊ लागली, तरीही काही आंदोलक उपस्थित असल्याने गाड्यांवर वेगमर्यादा लागू होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world